भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले   

गंगाधाम चौकामधील भीषण घटना; दुचाकीस्वार गंभीर

पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

पुणे : सिग्नल सुटताच पुढे निघालेल्या दुचाकीला भरधाव मालमोटारीने जोरदार धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी मालमोटार चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या रस्त्यावर दिवसा जड वाहनांना बंदी असतानाही हा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  
 
दीपाली युवराज सोनी (वय-२९) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जगदीश पन्नालाल सोनी (वय-६१, दोघेही रा. गंगाधाम चौक) हे गंभीर जखमी झाले आहेत. दीपाली या जगदीश यांच्या सून होत्या. जगदीश हे दुचाकी चालवत होते. त्यांच्या पाठीमागे त्यांची सून दीपाली बसलेली होती. सिग्नल सुटताच जगदीश यांनी दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मालमोटारीने दोघांना जोरदार धडक दिली.
 
या धडकेत मालमोटारीच्या चाकाखाली आल्यामुळे दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश सोनी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गंगाधाम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
मालमोटार चालक शौकत अली पापालाल कुलकुंडी (वय-५१, रा. भवानी पेठ) यास मार्केटयार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कलम १०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर गंगाधाम चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज 

गंगाधाम चौकात तीव्र उतार असून भरधाव वाहनांमुळे वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. बेशिस्त चालक आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिका यांच्या समन्वयाने त्या चौकातील वाहतूक व्यवस्थेचा फेरविचार करण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. 

अवजड वाहनांमुळे अपघातात वाढ 

हा मार्केट यार्डचा परिसर असल्यामुळे गंगाधाम चौकात अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक पोलिसांनी वर्दळीच्या कालावधीत शहरात मालमोटार, मिक्सर अशा अवजड वाहनांना बंदी केली आहे. तरीही ही मालमोटार गंगाधाम चौकात कशी आली? वाहतूक पोलिस काय करत होते? असा सवाल नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत गंगाधाम चौकात भरधाव मालमोटारीने एका महिलेला चिरडले होते. तर तिची सून जखमी झाली होती. संतप्त स्थानिकांनी पोलिस व महापालिका प्रशासनाच्याविरोधात आंदोलन केले होते.

वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष? 

या मार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी आहे. असे असतानाही येथून जड वाहने बिनधास्तपणे सुरू आहेत. बंदी असूनही जड वाहने कशी? असा सवाल स्थानिकांनी पोलिस व महापालिका प्रशासनाला विचारला आहे. वाहतूक पोलिसांकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. 
 
शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदीच्या ठिकाणी जड वाहने दिसल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यापुढे जड वाहनचालकांवर कठोर कारवाईसाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनातर्फे कडक पावले उचलली जातील. अपघाताच्या संदर्भात विविध उपाययोजना राबविले जात आहे. चालकांनी सुद्धा वाहने चालविताना काळजी घ्यावी.  

अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक विभाग) 

गंगाधाम रस्त्याचा उतार कमी करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने काही महिन्यांपूर्वी निविदा काढली होती. मात्र, याठिकाणी होणार्‍या उड्डाण पुलाच्या रचनेवरुन एकमत होत नसल्यामुळे या निविदेचे काम रखडले आहे. मागील वर्षी या रस्त्यावर एका महिलेला प्राण गमावावे लागले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावर गतीरोधक लावले होते. मात्र, उड्डाणपुलाच्या वादात या रस्त्याचा उतार कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे आणखी एका महिलेला प्राण गमवावे लागले आहे.

दुर्दैवी योगायोग...

गेल्या वर्षी जून महिन्यात १२ तारेखाला दुपारी साडेबाराच्या सुमारास याच गंगाधाम चौकात भरधाव डंपरने एका महिलेला चिरडले होते. तर, या महिलेची सून गंभीर जखमी झाली होती. कालच्या भीषण अपघातानंतर वर्षभरापूर्वीच्या अपघाताची आठवण जागी झाली. मागील वर्षी वाळू घेऊन निघालेल्या भरधाव डंपरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणार्‍या महिलेचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिलेचे शीर धडापासून वेगळे झाले होते. 
 

Related Articles