संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा   

उस्ताद अमजद अली खान यांचे मत  

पुणे : संगीताचे स्वर समजून घेण्यासाठी एक जन्म अपूर्ण असून त्यांच्या तांत्रिकतेमध्ये आणि व्याकरणात अडकून पडण्यापेक्षा मूळ रचनेवर अधिक भर दिल्यास ते चिरकाल टिकेल, असे मत सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांनी व्यक्त केले. 
 
पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, करोना काळात बंद पडलेला ’ग्लोबल पुलोत्सव’ पुन्हा सुरु झाला आहे. या ग्लोबल पुलोत्सवानिमित्त मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिरात सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुलोत्सव जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.      
 
’कोहिनूर’ प्रस्तुत व ’लोकमान्य मल्टी पर्पज को -ऑप सो. लि’. आयोजित महोत्सवाचे सह- प्रयोजक ’बेलवलकर सांस्कृतिक मंच’, ’लोकमान्य कल्चरल फॉउंडेशन’ व ’प्रथमेश कन्स्ट्रुक्शन’ आहेत. या महोत्सवास ’एनएफडीसी- राष्ट्रीय चित्रपट संग्रहालंय’, ’कार्टूनिस्ट कंबाइन’  व ’महाराष्ट्र साहित्य परिषद’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
 
यावेळी स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बेलवलकर हाऊसिंगचे समीर बेलवलकर, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी उपस्थित होते. सोहळ्यानंतर उस्ताद अमजद अली खान यांच्याशी चित्रपट दिग्दर्शक मकरंद ब्रम्हे यांनी प्रकट संवाद साधला. उस्ताद अमजद अली खान म्हणाले, वैयक्तिक हीत आणि स्वार्थ बाजूला सारत संगीत क्षेत्रातील दिग्गद पूर्वसुरींनी संगीताची साधना आणि संगीताचे पावित्र्य जपण्यावर कायम भर दिला. माझ्या वडिलांचा मी पारंपारिक शिक्षण घेण्यास विरोध होता. एकतर पुस्तके किंवा संगीत यापैकी एकच काही होऊ शकते, अशी त्यांची धारणा होती. संगीत क्षेत्रातील दिग्गजांची एक पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. साहित्य विश्वात दिग्गज असलेले पु. ल. देशपांडे यांच्या नावाने मला आज पुरस्कार मिळाला, हा माझ्यासाठी भाग्यक्षण आहे.             
        
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, सरोद हे एक गंभीर वाद्य आहे. परंतु, उस्ताद अमजद अली खान यांनी त्यामध्ये जीव आणि प्राण ओतले. समोरच्याला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावण्याची ताकद उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनामध्ये आहे. उस्ताद अमजद अली खान यांचा सतार, तबला आणि सरोद वादनात हातखंडा असून ते एक चिंतनशील वादक आहेत. सरोद वादनात त्यांचे प्रभुत्व असून त्यांच्या वादन कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी सरोद हे वाद्य जागतिक पातळीवर नेले. संगीत हे हृदय आहे, तर अध्यात्म हा आत्मा आहे. भारताने संपूर्ण विश्वाला अध्यात्म आणि स्वरांची भाषा या दोन मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत. यामध्ये उस्ताद अमजद अली खान यांच्या अनेक पिढ्यांचे योगदान आहे. 
 

Related Articles