आंधळा मागतो पाव टक्का...   

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गेल्या आठवड्यात रेपो दरात अर्धा टक्का आणि दुधात साखर म्हणून की काय कॅश रिझर्व रेशो (सीआरआर) मध्येही १ टक्का कपात जाहीर केली व बाजाराला दोन मोठ्ठे, पण अतिशय सुखद धक्के दिले. 
 
या वेळेस फक्त पाव टक्का कपात होणार हे सर्व तज्ज्ञ विश्लेषकांनी छातीठोकपणे सांगितले होते, इतकेच नव्हे तर पाव टक्क्याहून अधिक कपात जाहीर झाली, तर बाजारामध्ये विक्रीचा मारा होईल हेही एका विश्लेषकाचे म्हणणे होते. बाजाराने अर्थात नेहमीप्रमाणे सर्व अंदाज चुकीचे ठरवले. 
 
कपात जाहीर झाल्यापासून बँक निफ्टीने ५५,५८४ ते ५६,५९७ अशी १०१३ अंकांची जोरदार उसळी मारली आणि बाजार बंद होतेवेळी ५६,५७८.४० या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकसुद्धा २४,७४१ च्या पातळीवरून उसळून २५,०००.०५ पातळीवर बंद झाला. 
 
गुरुवारपर्यंत बाजाराची वाटचाल कमालीची मरगळलेली होती. फक्त संरक्षण उद्योग क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये तेजी दिसून येत होती. (हे असे काही झाले, की टीव्हीवरील सर्व व्यावसायिक वाहिन्यांची फार कोंडी होते. कारण भाव तिथे देव हे त्यांचे ब्रीद वाक्य असते. जेव्हा भाव हलत नाहीत, तेव्हा लोकांना सांगायचे काय? हा त्यांच्या पुढील यक्ष प्रश्न असतो. या वाहिन्यांवरील निवेदक-निवेदिकांना देखील शुक्रवारी हायसे वाटले असणार.)
 
तसे बघितले तर आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा यांनी अर्थव्यवस्थेच्या सर्व स्तरांवरील मरगळ दूर केली. रिझर्व बँकेच्या या निर्णयामुळे काय घडणे अपेक्षित आहे ते थोडक्यात पाहूया :
 
गेली काही वर्षे देशात महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने व्याज दर वाढीचे अस्त्र सातत्याने वापरले होते, तसेच सीआरआरही वरच्या पातळीवर नेऊन ठेवला होता. 
 
या प्रयत्नांना यश येऊन, महागाई आता आवाक्यात आली, अशी चिन्हे दिसू लागल्यावर आरबीआयने आपली पकड ढिली केली, जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाचा ओघ वाढेल व त्याची किंमत(व्याज) कमी असेल. बँकांकडे काही वेगळे न करता अतिरिक्त भांडवल उभे राहिल्यामुळे वाढीव दराने मुदत ठेवींद्वारे पैसे गोळा करण्याची गरज उरणार नाही. यामुळे त्यांच्या निव्वळ व्याज उत्पन्नावर परिणाम होणार नाही आणि व्याजदरातील कपात बँका आपल्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचवू शकतील. कमीदराने पत पुरवठा होऊ लागला, की अर्थातच अर्थव्यवस्थेची चक्रे फिरण्याचा वेग वाढेल.
 
अशा प्रकारे अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागताच बाजारामध्ये तेजी दिसून आली. आता बाजार नेहमी चालून गेलेल्या गोष्टी विसरून पुढे काय घडणार आहे याच्या मागावर असतो. त्यामुळे व्याजदर कपातीची तेजी ही थोड्या दिवसात ओसरेल व नवीन घडामोडींवर प्रतिक्रिया द्यायला बाजार सरसावून बसेल.... अर्थात त्याविषयी पुढील लेखात सविस्तर!

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles