सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा   

कोलंबो : भारत आणि श्रीलंकेत नुकतीच सागरी सुरक्षा वाढविण्यावर चर्चा झाली. या उच्चस्तरीय संवादात द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करणे, सागरी सुरक्षा वाढवणे तसेच प्रशिक्षण आणि धोरणात्मक सहभागामध्ये सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधणे यावर भर देण्यात आला, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 
कोलंबो येथे श्रीलंका-भारत संरक्षण संवाद पार पडला. श्रीलंकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव एअर व्हाइस मार्शल संपत थुयाकोंथा (निवृत्त) यांनी केले, तर भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. श्रीलंका आणि भारत यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारीला दुजोरा देत दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी चर्चेत भाग घेतला. भारतीय संरक्षण सचिवांनी संरक्षण उपमंत्री, मेजर जनरल अरुणा जयसेकरा (निवृत्त) आणि थुयाकोंथा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. 
 
भारत आणि श्रीलंकेने पहिल्या संरक्षण भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. भारतीय शांतता दलाच्या बेट राष्ट्रात हस्तक्षेपामुळे संबंध ताणले गेल्यानंतर जवळपास चार दशकांनंतर द्विपक्षीय संरक्षण संबंधांना मोठी चालना मिळणार आहे. हा करार विद्यमान लष्करी सहभागाला अधिक संरचित सहकार्याचा मार्ग मोकळा करेल, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले आहे.
 

Related Articles