एकत्र येण्याबाबत दोन्ही बंधूंनी बोलले पाहिजे   

अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

मुंबई, (प्रतिनिधी)  : उद्धव आणि राज ठाकरे या दोघा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतची थंडावलेली चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. प्रसारमाध्यमातून चर्चा करून उपयोग नाही, एकत्र यायचे असेल तर दोन्ही भावांनी याबाबत बोलले पाहिजे, असे स्पष्ट मत मनसे नेते व राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी व्यक्त केले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी देखील मराठी माणूस, महाराष्ट्र हितासाठी कोणी सोबत येणार असेल तर सोबत घेऊन लढू, असे मत व्यक्त केले आहे.
 
विधानसभा निवडणुकांत मनसे तसेच शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला. लवकरच मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिका ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे. पक्षाच्या स्थापनेला १८ वर्षे झाली तरी जम बसवू न शकलेल्या मनसेसाठी, तसेच उद्धव ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज यांनी एकत्र येण्याच्या विषयाला सुरूवात केली होती. उद्धव यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे किमान महापालिका निवडणुकांसाठी तरी दोघे बंधू एकत्र येतील अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या. मात्र, दरम्यानच्या काळात उद्धव हे परदेशात होते. त्यामुळे या चर्चांना ब्रेक लागला. मात्र, त्यांच्या पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सातत्याने या विषयावर आम्ही सकारात्मक आहोत, अशी भूमिका मांडली. 
 
मनसे नेते मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेऊन प्रतिक्रिया देत आहेत. २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने यावेळी त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्राच्या हितासाठी सोबत घेऊन लढू : आदित्य 

आमच्याकडूनही प्रतिसाद देण्यात आला आहे. मराठी माणूस, महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी सोबत येणार असेल तर सोबत घेउन लढू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर आदित्यकडे त्याच्या काकांचा नंबर आहे. ते त्यांच्याशी थेट बोलू शकतात असे अमित ठाकरे म्हणाले.
 

Related Articles