मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालीन आराखडा तयार करा : शेलार   

मुंबई, (प्रतिनिधी) : एमएमआरडीए तसेच मेट्रोची सर्व प्राधिकरणे यांनी आपापसात समन्वय तर ठेवावाच सोबत मुंबई महापालिकेशी ही सतत संपर्क आणि समन्वय ठेवा, कोणीही  कोणत्याही परिस्थितीत दोषारोप न करता एक  पथक म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे कामे करा, असे स्पष्ट आदेश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. गर्दीच्या मेट्रो स्टेशन्ससाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यासही त्यांनी सांगितले.  
 
मुंबईतील मान्सून पूर्व कामांच्या आढाव्यासाठी एमएमआरडीए कार्यालयात जाऊन पालकमंत्री म्हणून आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यापुर्वीच्या केलेल्या कामांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. 
 
यामध्ये एमएमआरडीए व महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांकडून स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन मदत सेवेसाठी चोवीस तास सेवा देण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे. १९ ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहेत. १०७ ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत यासह पावसाळ्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत देण्यात आली. भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन द्या, दुर्दैवाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर  अंधेरी, घाटकोपर सारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरुन  प्रवाशांना बाहेर काढण्याबाबत आपत्कालीन आराखडा तयार करा, ज्यामध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट यांना समाविष्ट करुन घ्या, असे निर्देश शेलार यांनी अधिकार्‍यांना दिले.

Related Articles