पंतप्रधान मोदींनी घेतली शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट   

कानपूर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी याच्या कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भेट घेतली. येथील चकेरी विमानतळावर ही भेट पार पडली. ही एक अतिशय भावनिक भेट होती, असे शुभमचे चुलत भाऊ सौरभ द्विवेदी यांनी सांगितले. पंतप्रधानांची भेट घेताच संपूर्ण कुटुंबाला रडू कोसळले, असेही ते म्हणाले. 
 
पंतप्रधानांनी शुभमची पत्नी ऐश्वर्या हिचे सांत्वन केले. तसेच, दहशतवादाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही, असे सांगितले.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. धर्म आणि नाव विचारुन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये शुभमसह २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. शुभमचे लग्न काही आठवड्यांपूर्वीच म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी झाले होते. शुभम पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत पर्यटनासाठी आला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तानंतर लष्करी संघर्ष झाला होता. अखेर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले होते.

Related Articles