राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे   

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतचा  कुठलाही प्रस्ताव सध्या पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत  आहोत. आम्ही आघाडीतच राहणार असून या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरुर पक्षात स्वागत आहे, असे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केले होते. याशिवाय शरद पवार गटातील काही आमदारांची मानसिकता अजित पवार यांच्यासोबत जाण्याची आहे, त्यामुळे शरद पवार गटाचे अजित पवार गटात विलिनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पाश्वर्र्भूमीवर काल  पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली.  ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर नसताना त्याला विरोध असणे, अनुकूल असणे, प्रतिकूल असणे हा प्रश्नच उद्भवत नाही. 
 
आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेसोबतच ‘एनडीए’मध्ये सहभागी आहोत. त्यामुळे आमचा पुढचा राजकीय प्रवास त्यांच्यासोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचे काहीच  कारण नाही, असेही तटकरे म्हणाले.
 
राष्ट्रवादीत  २०१४ पासून भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत  अनेकवेळा चर्चा झाली होती. अनेक प्रसंग, निर्णय टप्प्यापर्यंत पोहचलो होतो. परंतु, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आज आम्ही घेतलेली भूमिका आणि  विलिनीकरण हे दोन ध्रुवावरील विषय दिसतात, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय हा सामूहिक होता, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
 

Related Articles