सहा वर्षांमधील नीचांकी महागाई   

वृत्तवेध 

ताज्या सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर फक्त ३.१६ टक्के होता. तो गेल्या सहा वर्षांमधील सर्वात कमी आहे. अन्नपदार्थांच्या किमती थोड्या कमी झाल्या आहेत. एप्रिल २०२५ मध्ये अन्नधान्य महागाई १.७८ टक्क्यांवर घसरली. मार्चमध्ये ती २.६९ टक्के, तर फेब्रुवारीमध्ये ३.७५ टक्के होती. म्हणजे थाळी काही प्रमाणात स्वस्त झाली आहे; पण सगळेच नाही. तेल, फळे आणि दूध यासारख्या वस्तू अजूनही महाग आहेत. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर भाज्या, अंडी, डाळी, मांस आणि माशांच्या किमती मंद गतीने वाढल्या; परंतु फळे, तेल आणि दुधाच्या किमती वाढतच राहिल्या.
 
अन्न आणि पेये वार्षिक २.१४ टक्के दराने वाढली. हा दर मार्चमध्ये २.८८ टक्के होता. सलग तीन महिने महागाई चार टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. २१ अर्थतज्ज्ञांनी एप्रिलमध्ये महागाई ३.२ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली होती. प्रत्यक्ष आकडा त्यापेक्षा थोडा कमी राहिला. आता सर्वांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे लागल्या आहेत.
 
गेल्या महिन्यात रिझर्व बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर सहा टक्क्यांपर्यंत कमी केला आणि आता जूनमध्ये आणखी एक कपात होण्याची अपेक्षा आहे. रिझर्व बँकेने २०२५-२६ चा जीडीपीवाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्के केला आहे. याचे कारण जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियावर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची असलेली भीती. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या मते आता फक्त महागाई नियंत्रित करण्यापासून कर्जवाढ आणि आर्थिक पाठिंब्याकडे लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

Related Articles