बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी   

कवठे येमाई,(वार्ताहर) : चांडोह (ता.शिरुर) येथील शिंदे मळा येथे मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली असून नशीब बलवत्तर म्हणून वेळीच मिळालेल्या मदतीमुळे तिला जिवदान मिळाले आहे. संगिता अंकुश शिंदे (वय ५०) असे या जखमी महिलेचे नाव आहे. तर घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे.
 
चांडोह येथील शिंदे मळ्यात अंकुश शिंदे यांचे घर असून सकाळच्या वेळी अंकुश यांची पत्नी संगिता हि घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाथरूमकडे लघुशंकेसाठी गेली होती. तेथेच छोट्याशा झुडूपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत संगिताच्या मानेला जबड्यात पकडून सुरक्षितस्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या बिबट हल्ल्याने गोंधळून गेलेल्या संगिताने आरडा ओरडा करत प्रतिकार केला. 
 
हा आवाज घराकडील लोकांपर्यंत गेल्याने त्यांनी वेळीच धाव घेत प्रसंगावधान राखून बिबट्याचा हल्ला परतावून लावत संगिताची त्याच्या तावडीतून सुटका केली. 
यावेळी काळ आला होता पण संगितावर वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आला. बिबट्याच्या हल्ल्यात संगिता शिंदे  हिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या असल्याने तत्काळ पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील रुग्णालयामध्ये दाखल केले गेले.
 
घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक अमोल सातपुते, शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनपाल गणेश पवार,वनरक्षक लहू केसरकर यांनी घटना स्थळी धाव घेऊन जखमी संगिता शिंदे हिची दवाखान्यात जाऊन भेट घेतली.कर्मचारी महेंद्र दाते,शिरूर वन रेस्क्यूटींमचे शुभम शिस्तार,रोहित येवले, सुदर्शन खराडे, कृष्णकांत सरोदे यांनी बिबट्याला पकडण्यासाठी घटना स्थळी दोन पिंजरे आणून लावले असून तेथे गस्त ठेवली आहे.या परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर असून वनविभागाने त्यांचा वेळीच बंदोबस्त केला असता तर आज हि घटना घडली नसती असे देविदास शिंदे यांनी सांगितले. तर घटना स्थळी पिंजर्‍यांची संख्या वाढवून ट्रॅप कॅमेरे लावावे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिरूर खरेदी विक्री संघाचे संचालक संपतराव पानमंद, म्हतारबा शेलार, दादाभाऊ पानमंद, सुभाष शेलार,विकास शेलार यांनी केली आहे.
 
चांडोह येथील बिबट्या लवकरच पिंजर्‍यात जेरबंद केला जाईल तसेच तसेच शेतकर्‍यांनी पहाटे घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, एकट्या व्यक्तीने रात्रीचे अंधारात जाण्याचे टाळावे, घरा बाहेर पडताना अंधारात टॉर्च वापरावी मोबाईलचा वापर करावा, असे आवाहन उपवन संरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.
 

Related Articles