जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा   

संतोष जोशी यांचे प्रतिपादन

पुणे : भूतकाळातील पश्चात्ताप व भविष्याची चिंता न करता वर्तमानाचा आनंद घेतल्यास मन अधिक स्थिर राहते. याशिवाय, स्वतःला स्वीकारणे आणि स्वतःवर प्रेम करणे हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक आहे. माझे व्यक्तिमत्व अद्वितीय असून, जीवनातील प्रत्येक क्षण मी स्वतःसाठी जगतो. स्वतःवर प्रेम करा, इतरांशी तुलना करु नका, आपले ध्येय ठरवा, हा आनंद मिळवण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे मत प्रसिद्ध वक्ते व लेखक संतोष जोशी यांनी व्यक्त केले. जीवनाचे उद्दिष्ट निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे देखील आनंदी जीवनाचे एक गमक आहे. छोटी-मोठी उद्दिष्टे जीवनाला दिशा देतात, अशी विविध उदाहरणे देत त्यांनी यशाचे गमक उलगडले.
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘आनंदी जीवन जगण्याचे सुवर्ण नियम’ या विषयावर संतोष जोशी बोलत होते. जोशी म्हणाले, आपले व्यक्तिमत्व अद्वितीय आहे, हे समजूनच आयुष्य जगा. स्वतःसाठी वेळ द्या. आपला अंतरात्म्याशी बोलण्यास शिका, रागात कोणालाही प्रतिक्रिया देऊ नका, निर्णय घेऊ नका, या सर्व सुवर्ण नियमांचा अवलंब करुन प्रत्येक व्यक्ती आपले जीवन अधिक आनंददायी, समृद्ध व अर्थपूर्ण बनवू शकतो. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी यादी तयार करा. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी हळूहळू प्रयत्न करा. प्रयत्न करणे सोडू नका, असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला. आपले आर्युमान सरासरी ८० वर्षे आहे, असे समजून आपण किती वेळ वाया घालवतो, स्वःसाठी किती जगतो? असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. इतर कोणाशीही तुलना न करता मनसोक्त आयुष्य जगा. आपल्या प्राथमिकेतला प्रधान्य द्या, प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आपल्याला जगता आला पाहिजे, असेही यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
 
दररोज आपल्या जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त केल्याने मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. गुणाचा आणि क्षमतेचा ठेवा आपल्याकडे भरपूर असतो, तो ठेवा आपणाला ओळखता आला पाहिजे. आपण सगळ्या गोष्टीला खूप वेळ देतो. मात्र ज्या आपल्याला गरजेच्या असतात त्याकडे आपण दूर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्या प्राथमिकतेला महत्त्व द्या. वेळ, मर्यादा, ऊर्जा, संसाधनाचा विनियोग करुन आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा, असाही सल्ला यावेळी जोशी यांनी दिला. सुत्रसंचालन प्रियंका शेट्टी यांनी केले.

Related Articles