E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
कुंपणे नाकारणारी लेखिका!
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
चर्चेतील चेहरे , राहुल गोखले
गीतांजली श्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या, ’टोम्ब्ज ऑफ सँड्स’ या अनुवादाला २०२२ साली बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले होते. कोणत्याही मूळ भारतीय भाषेतील पण अनुवादित पुस्तकाला बुकर पारितोषिक मिळण्याची ती पहिलीच वेळ होती. त्याच पंक्तीत आता बानु मुश्ताक या कन्नड लेखिकेचा समावेश झाला आहे. बानु मुश्ताक यांच्या ’हृदय दीप’ या मूळच्या कन्नड भाषेतील लघुकथा संग्रहाच्या ’हार्ट लॅम्प’ या दीपा बष्टी यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाला यंदाचे बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे.
बानु यांनी १९९० ते २०२३ या काळात लिहिलेल्या पन्नासेक लघुकथांमधील निवडक बारा कथांचा हा संग्रह. मुश्ताक यांच्या कथांचा गौरव करताना बुकर समितीने म्हटले आहे की ’जगण्याची आणि चिकाटीची प्रेरणा असलेल्या अद्भुत पात्रांचे चित्रण या कथांतून करण्यात आले आहे’. २०१३मध्ध्ये कन्नड साहित्यिक यू आर अनंतमूर्ती यांना बुकर पारितोषिकाचे नामांकन मिळाले होते; पण प्रत्यक्ष पारितोषिकाने त्यांना हुलकावणी दिली होती. आता एका तपानंतर अनंतमूर्ती यांचे स्वप्न बानु मुश्ताक यांनी पूर्णत्वास नेले आहे असेच म्हटले पाहिजे.
बानु यांच्या कथा या पुरुषप्रधान संस्कृतीत मुस्लिम महिलांच्या वाट्याला येणारे दुःख; शोषण, वेदना चित्रित करणार्या आहेत. एका अर्थाने हे धाडसच. पण ही बंडखोरी बानू मुश्ताक यांच्यात कायमच राहिली आहे. १९४८ मध्ये कर्नाटकातील हसन जिल्ह्यात जन्मलेल्या बानु यांची मातृभाषा उर्दू. त्यांचे वडील शासकीय कर्मचारी होते. त्यांनी आपल्या कन्येला तिच्या वयाच्या आठव्या वर्षी एका कॉन्व्हेंट शाळेत दाखल केले. एका अर्थाने बानु मुश्ताक यांची दृष्टी विस्तारण्याची ती सुरुवातच म्हटली पाहिजे. तेथेच त्यांचा परिचय कन्नड भाषेशी झाला. प्रथम तोडकेमोडके कन्नड त्या बोलत असत; पण पुढे साहित्यिक झाल्यावर तीच त्यांची माध्यमभाषा झाली हे विशेष. ज्या वयात त्यांच्या मैत्रिणी संसारात रमू लागल्या होत्या आणि मुलांना वाढवीत होत्या त्या वयात मुश्ताक यांनी मात्र ते निर्बंध झुगारून महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांच्या बंडखोर वृत्तीचेच हे उदाहरण म्हटले पाहिजे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांचे वैवाहिक जीवन मात्र फारसे समाधानाचे नव्हते. किंबहुना माहेरी जितके स्वातंत्र्य होते तितकाच सासरी त्यांचा कोंडमारा होत होता.
वास्तविक शालेय जीवनातच बानु लिहू लागल्या होत्या. पण लग्नानंतर त्यांचे लेखन थांबले. बुरखा घालण्याची त्यांना सक्ती करण्यात आली. घराच्या चार भिंतींत राहण्याची ताकीद त्यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांचा जीव घुसमटू लागला. त्यांना मूल झाले तरी त्यानंतर बानु यांना नैराश्याचे झटके येऊ लागले. त्याच तिरमिरीत त्यांनी एकदा स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. पण त्यांच्या नवर्याने वेळीच त्यांना रोखले आणि काडेपेटीची काडी त्यांच्या हातातून हिसकावून घेतली. आपले मूल आपल्या पत्नीच्या पायाशी ठेवून बानु यांच्या पतीने त्यांची गयावया केली. आपल्याला सोडून जाऊ नकोस म्हणून आर्जवे केली.बानु यांना आत्महत्या करण्यापासून त्यांच्या पतीने रोखले आणि एका अर्थाने बानु यांचा पुनर्जन्मच झाला. या वैयक्तिक अनुभवांचे प्रतिबिंब मुश्ताक यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखांत उमटू लागले.
१९७० चे दशक महाराष्ट्रात जसे दलित आणि विद्रोही साहित्याच्या प्रस्फुटिकरणाचे दशक होते; तसेच ते कर्नाटकात देखील होते. बंडाया चळवळ- म्हणजेच शोषितांना व्यासपीठ मिळवून देणारी चळवळ- कर्नाटकात उभी राहत होती. त्या चळवळीने बानु यांना प्रभावित केले आणि नंतर त्या स्वतः त्या चळवळीचा भाग बनल्या. बंडाया चळवळीची सक्रियता हसन जिल्ह्यात होतीच. दलित साहित्य, महिला हक्क, मुस्लिम साहित्य या सर्वांत ती सक्रियता होती. त्या चळवळीची जवळपास रोज निदर्शने असत. त्या चळवळीने कर्नाटकातील राजकारणाला प्रभावित केले; तसेच कन्नड साहित्यालाही. ती केवळ एक चळवळ नव्हती; अन्यायाविरोधातील प्रतिकाराचे ते प्रतीक होते.
या चळवळी बरोबरच अवतीभवतीच्या जगाचे दर्शन त्यांना होत होते. त्यातही विशेषतः मुस्लिम महिलांना धार्मिक कर्मठांच्या निर्बंधांची झळ पोचत असल्याचे त्या पाहत होत्या. चित्रपट पाहण्यावर निर्बंधांचा आदेश झुगारून एक मुस्लिम महिला चित्रपट पाहायला गेली. त्यानंतर तिच्या झालेल्या छळाचे प्रकाशित झालेले वृत्त वाचून बानु अस्वस्थ झाल्या आणि संतापल्या देखील. त्यानंतरच त्यांचा संबंध लंकेश पत्रिका वृत्तपत्राशी आला आणि त्या त्या पत्राच्या हसन जिल्हा वार्ताहर झाल्या. वार्ताहर म्हणून मुश्ताक या सर्व घडामोडींच्या साक्षीदार होत्याच; पण त्यांचा दृष्टिकोन देखील त्यामुळे व्यापक होत होता. हसन नगर परिषदेची निवडणूक बानु यांनी लढविली होती आणि दोन कार्यकाळ त्या तेथे कार्यरत होत्या ही त्यांची निराळी ओळख.
सुमारे दशकभर वार्ताहर म्हणून काम केल्यानंतर बानु मुश्ताक वकील झाल्या. त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविलाच; पण समाजातील शोषित महिलांच्या हक्कांसाठी त्या लढू लागल्या. वकील म्हणून काम करताना मुश्ताक यांना पीडित महिलांच्या दुःखाची, वेदनांची, त्यांच्या शोषणाची अधिकाधिक कल्पना येऊ लागली. आणि मग तीच पात्रे त्यांच्या साहित्यातून दिसू लागली. महिलांना आपण कायदेशीर सल्ला मोफत देतो असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आपल्या अशीलाशी चर्चा करताना त्या जी टिपणे काढीत असत त्यांची नोंद त्या दोन वेगवेगळ्या पद्धतीने करीत असत- एक, तो खटला चालविण्याच्या दृष्टीने आणि दोन, त्या महिलांच्या भावनिक संघर्षाच्या कहाण्या. त्या कहाण्या मग मुश्ताक यांच्या कथांचा गाभा होत असे. त्यांच्या कथांतून त्यांचा बंडखोर पिंड देखील दृग्गोचर होत असे; तसाच त्यांच्या भूमिका-वक्तव्यांमधूनही. मशिदीत प्रार्थना करण्याचा अधिकार मुस्लिम महिलांना देखील आहे असे वक्तव्य २००० मध्ये बानु यांनी केले होते. त्यानंतर धार्मिक कर्मठांचे त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले. त्यांच्या विरोधात फतवे निघाले. एवढेच नाही तर एकाने त्यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला होता. (येथे सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत झालेल्या चाकू हल्ल्याचे आणि त्यावर ‘नाईफ’ याच शीर्षकाने रश्दी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे स्मरण होणे स्वाभाविक). अर्थात हल्लेखोराला मुश्ताक यांच्या पतीने वेळीच पकडल्याने पुढचा अनर्थ टळला. आपण बहिष्कार, धमक्या, आघात सहन केले आहेत असे बानु म्हणतात; ते खरेच. अर्थात त्यांनी त्यास धूप घातली नाही. त्या निर्भीडपणे लेखन करीतच राहिल्या.
त्यांचे आजवर सहा कथासंग्रह, एक निबंध संग्रह, एक कादंबरी आणि एक काव्य संग्रह असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांच्या कथांवर आधारित चित्रपट निघाले आहेत. त्यांचे विषय देखील मुस्लिम महिलांवर होणार्या शोषणाचे, आघातांचे आहेत; तसेच त्यांच्या जिद्दीचेही आहेत. त्यांच्या कथांचे भाषांतर उर्दू, हिंदी, मल्याळी, तामिळ भाषेत झाले आहे. त्यांच्या कथा वाचून महिलांना लढण्याची उमेद मिळते. आपल्या कैफियती बानु मुश्ताक यांच्याकडेच मांडणे इष्ट असे अनेक महिलांना त्यांच्या कथा वाचून वा त्यांवरील चित्रपट पाहून वाटते. एका महिलेने आपल्या वेदना मुश्ताक यांना बोलून दाखविल्या; तेंव्हा ’हे तुम्हाला मलाच का सांगावेसे वाटले?’असा सवाल मुश्ताक यांनी त्या महिलेस केला. तेंव्हा मुश्ताक यांच्या कथेवरील पारितोषिक विजेता चित्रपट पाहून हीच आपली कैफियत मांडण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचे त्या महिलेने सांगितले. आपल्या लेखनाचा असा प्रभाव पडतो आहे; त्याने अनेकांच्या जीवनात फरक पडत आहे हे ऐकून बानु यांना समाधान वाटणे आणि आपले लेखन सार्थकी लागल्याची भावना होणे स्वाभाविक. त्यांच्या कथांचा अनुवाद असणार्या ’हसीना अँड अदर स्टोरीज’ या पुस्तकाला २०२४ चे पेन ट्रासनलेशन पारितोषिक मिळाले होते. त्याखेरीज कन्नड साहित्य अकादमीच्या पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. आणि आता त्यांच्या कथांच्या अनुवादाला थेट बुकर पारितोषिक मिळाले आहे.
भारतातील एका प्रादेशिक भाषेतील साहित्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतील जाणे याचे श्रेय मुळात बानु मुश्ताक यांच्या सकस कथांना जाते. स्वतःच्या जीवाचीही तमा न बाळगता आपल्याला जे पटेल तेच लिहिणार्या बानू मुश्ताक यांच्या शिरपेचात बुकर पारितोषिकाने आणखी एक मनाचा तुरा खोवला आहे यात शंका नाही.
Related
Articles
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !