शाळांमध्ये स्थापन होणार ’शुगर बोर्ड’   

सीबीएसईकडून पुढाकार

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी सीबीएसई संलग्न शाळांमध्ये लवकरच ’शुगर बोर्ड’ स्थापन केली जातील. मुलांमध्ये मधुमेहाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत,  सीबीएसईने साखर मंडळ स्थापन करण्याचे निर्देश जारी केले आहेत.  गेल्या दशकात मुलांमध्ये टाइप-२ मधुमेहात लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे, यामुळे हा निर्णय घेतल्याचे सीबीएसईने म्हटले आहे.
 
साखर मंडळामार्फत शाळांमध्ये चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. तज्ज्ञ मुलांना साखरेच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करतील. या संदर्भात सीबीएसईने संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना जारी केल्या आहेत. 
 
पूर्वी टाइप-२ मधुमेह हा आजार प्रामुख्याने प्रौढांमध्ये दिसून येत होता, परंतु आता मुले देखील त्यास बळी ठरत आहेत. ही चिंताजनक प्रवृत्ती मुख्यत्वे जास्त साखरेच्या सेवनामुळे आहे. बहुतेकदा शाळेच्या कॅम्पसमध्ये गोड स्नॅक्स, पेये आणि प्रक्रिया केलेले अन्न सहज उपलब्ध होतात, यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी शुगर बोर्डाची असेल.  
 
जास्त साखरेचे सेवन केल्याने केवळ मधुमेहाचा धोका वाढत नाही तर लठ्ठपणा, दंत समस्या आणि इतर विकार देखील वाढतात. ज्याचा मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, सीबीएसई मंडळाने शाळांना ’शुगर बोर्ड’ स्थापन करण्यास सांगितले आहे. जिथे विद्यार्थ्यांना जास्त साखरेच्या सेवनाच्या धोक्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी माहिती प्रदर्शित केली जाईल.  
 
मंडळाने म्हटले की, शाळांनी या संदर्भात आवश्यक ती कारवाई करावी, जेणेकरून निरोगी शालेय वातावरण निर्माण करता येईल. सीबीएसईने आपल्या निवेदनात म्हटले, ’एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की ४ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी दररोजच्या कॅलरीजच्या सेवनात साखरेचा वाटा १३ टक्के आहे. ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १५ टक्के आहे, तर दररोजच्या कॅलरीजचे सेवन फक्त पाच टक्के असावे.

Related Articles