प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध   

परामर्श, डॉ.दीपक बोरगावे 

भारतीय आणि हिंदी साहित्यातील मुन्शी प्रेमचंद (धनपत राय श्रीवास्तव, १८८०-१९३६) हे नाव मोठे आहे. या लेखकाचे आज स्मरण कशासाठी? आपल्या साहित्यातून आणि कथा-कादंबर्‍यांमधून प्रेमचंद यांनी तत्कालीन समाजाला संबोधित केले. आज २१व्या शतकातील सांस्कृतिक भौतिकतेत त्याचा अन्वय काय आहे? त्यांनी मांडलेले प्रश्न आज सुटलेले आहेत? की ते अनुत्तरीतच आहेत? आजच्या उत्तराधुनिक कालखंडातील सांस्कृतिक व्यवस्थेत करमणूक प्रधान उद्योगांनी आपणाला घेरलेले आहे. अशा कालावकाशात हा लेखक आणि त्याचे साहित्य कालबाह्य ठरते का?
 
रवींद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) हे प्रेमचंद यांचे समकालीन भारतीय लेखक होते; पण त्यांच्यासारखी प्रेमचंद यांना आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली नाही. इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून प्रेमचंद यांचे साहित्य जगभर पोचले खरे; पण त्यांना सन्मान मिळाला नाही. त्यांच्या कादंबर्‍यांचे इंग्रजीत अनुवाद झाले आहेत- गोदान (The Gift of a Cow) आणि सेवा सदन (The House of Service, Trans. by Ralph Russell), निर्मला आणि कफन (The Shroud, Trans., by David Matthews; उदय प्रकाश यांनी सुद्धा सेवा सदन आणि त्यांच्या काही कथा इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत), पंच परमेश्वर (The Five Masters, Trans., by Gordon C. Roadarmel), आणि ललित श्रीवास्तव यांनीही गोदान इंग्रजीत अनुवादित केली आहे. प्रेमचंद यांच्या कादंबर्‍या, त्यांचे विषय भारतीय ग्रामीण जीवनातील कृषी संस्थेशी आणि सामाजिक विषमतेशी संबंधित होते. हे प्रश्न इंग्रजी भाषेतून तत्कालीन वाचकांपर्यंत कसे आणि कितपत पोचले असावेत? असा एक प्रश्न येथे उपस्थित होतो.
 
गोदान (१९३६) ही त्यांची गाजलेली आणि यशस्वी कादंबरी आहे. चित्रपट-दिग्दर्शक गुलजार यांनी याच शीर्षकाची २७ भागांमध्ये दूरदर्शनसाठी २००४ मध्ये टेलिव्हिजन मालिका केली होती. हा ’सिनेमा’ युट्युबवर उपलब्ध आहे. भारतीय ग्रामीण जीवनाचे अत्यंत प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. समाजातील जातीची उतरंड आणि त्यातून होणारे गरीब समाजाचे शोषण, सावकारशाही, गरिबी आणि दारिद्र्यात खचलेला सर्वसामान्य समाज या गोष्टी होरी आणि धनिया या शेतकरी पात्रांच्या परिवेशातून आल्या आहेत. प्रेमचंद यांनी चितारलेला ग्राम-खेडेगाव आणि शहर यांच्यातला संघर्ष आजही तितकाच जिवंत आहे.
 
ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हा प्रश्नही या कादंबरीत आहे. आजही या प्रश्नाची सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि समाजशास्त्रीय गुंतागुंतीची चर्चा आपण करत असतो. सामाजिक नीतिमत्तेची चाड असणार्‍या संघर्ष करणार्‍या आणि परिघावर ढकलल्या गेलेल्या शेतकरी कुटुंबाची ही कहाणी प्रेमचंद यांनी वास्तववादी शैलीत लिहिली आहे. यात होरी, धनिया, गोवर्धन (गोबर), झुलिया, दातादीन या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणार्‍या पात्रांबरोबर तत्कालीन नागर जीवनातील दर्शनदेखील प्रेमचंद यांनी घडवलेले आहे. यातून ग्रामजीवन आणि शहरातील उच्चभ्रू जीवनाची तुलनात्मक समीक्षा केली आहे. राय साहब, मिस्टर अँड मिसेस खन्ना, वकील, मिर्झा साहब, इंग्लंडमधून शिकून आलेली, स्त्री-पुरुष समता मानणारी, बंडखोर भूमिका घेणारी, मध्यमवर्गीय मालती, फिलॉसॉफीचे प्राध्यापक मेहता अशी पात्रे या उपकथनात येतात. प्रेमचंद यांनी हे उपकथानक होरीच्या कथेशी जोडलेले आहे. यातील बहुतांश पात्रे ही स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील राजकीय चळवळीशी संबंधित आहेत. यात तत्कालीन ब्रिटिश राज्याच्या वसाहतवादी राजकीय व्यवहारावर सडेतोड लिहिणारे पत्रकार, विश्लेषक आहेत. काही जण तुरुंगातही जाऊन आलेले आहेत. मध्यमवर्गीय प्रागतिक विचार धारणा असलेली ही पात्रे ग्रामीण जीवनातले, शेतीचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, शिक्षण, आरोग्य वगैरे मूलभूत बाबींवर चर्चा करताना आढळतात; पण जेव्हा प्रत्यक्ष ग्रामजीवनाशी यांचा संपर्क होतो, तेव्हा यातील बर्‍याच पात्रांना विचार आणि कृती यात असणारा भेद स्पष्टपणे जाणवत जातो. त्यांना त्यांच्या विचारांच्या मर्यादांचीही जाणीव होते.
 
समस्या कायमच
 
आजच्या शहरी राजकीय पक्षांची परिस्थिती यापेक्षा वेगळी काय आहे? गांधीजींच्या प्रेरणेमुळे सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीत भारतीय ग्रामीण जीवन ढवळून निघाले होते. काँग्रेस पक्षाचे भरण-पोषण आणि पाया यातूनच तयार झाला. आज या आणि अशा पक्षांचा ग्रामजीवनाशी कुठे मोठा संबंध राहिला? काही अपवाद सोडल्यास आपल्या देशातील सत्तेत असणारे आणि नसणारे राजकीय पक्ष ग्रामीण जीवनातल्या समस्या व्यापक अर्थाने सोडवण्यास असमर्थ ठरले आहेत. यातील बहुतांशी समस्या आजही आहेत तशाच आहे. त्यात फार मूलगामी फरक पडलेला नाही.
 
तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा, स्त्री-पुरुष नात्यातील नैतिकतेचा विचार करता, या उपकथानकातील मालती आणि मेहता यांचे प्रेमसंबंध हे विलक्षणच म्हणावे लागतील. हे दोघेही खर्‍या अर्थाने आधुनिक वृत्तीच्या व्यक्ती म्हणता येतील. विवाह संस्था, स्त्री-पुरुष संबंध, पितृसत्ता आणि स्त्री-पुरुष समतेच्या वसाहतपूर्व कालखंडात आधुनिकतेचे वारे आपल्या देशात येऊन पोचले होते, त्याबद्दलची चिकित्सा या कथानकात आहे. यातील पात्रांचा संवाद आणि त्यानिमित्ताने झालेली चर्चा ही मुळातून वाचण्यासारखी आहे. 
 
गेल्या काही दशकांत लिव्ह-इन रिलेशनशिप वगैरे गोष्टींपर्यंत आपण पोचलो आहोत. स्त्री-पुरुष नात्यातील स्वातंत्र्य आणि त्याला असणारा कायद्याचा आधार या गोष्टींचा विचार केल्यास, प्रेमचंद हे त्या काळात आधुनिकतेचा पाठपुरावा करणारे लेखक होते का? का अधिकतर शहरातील बेगडी व्यवस्था, संस्कृती आणि तत्कालीन परिस्थितीत शहरांची जी निर्मिती होत गेली, ती ग्रामजीवनाच्या शोषणाची एक व्यवस्था होऊ पाहात आहे, याचे भाष्य या कथानकातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला असावा? स्त्री समतेचा विचार आपल्याकडे तेव्हा येऊ पाहात होता. त्याच्या पाऊलखुणा प्रेमचंद यांना स्पष्टपणे दिसल्या होत्या. त्या या कादंबरीत उमटलेल्या आहेत.
 
या कादंबरीत गाय ही प्रतिमा कृषी जीवनाची प्रतिमा आहे. पशुधन आणि शेती संस्थेचे निकटचे संबंध यातून स्पष्ट होतात. औद्योगीकरणानंतर ट्रॅक्टर, मशीनने पिकांवर होणारी औषधांची फवारणी, यंत्राद्वारे पीक कापणी, मळणी, शेतीमालाचा आज भांडवली व्यवस्थेत असणारा भाव या व अशा अनेक गोष्टी विचारात घेता, पशुधन म्हणून गाय या प्रतिमेचा आपण आज अन्वयार्थ काय लावणार? एकूणच शेतकर्‍याची आज राष्ट्रीय पातळीवर होणारी भीषण आणि अपमानास्पद राजकीय वागणूक हा अजून एक मुद्दा आपल्यासमोर उभा आहे. शेती उत्पादन अधिक वाढवण्यासाठी यंत्राचा वापर आपणाला नक्कीच करता येतो. योग्य औषधाची योजना आखून शेतीमध्ये बर्‍याच सुधारणादेखील करता येतात. या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक याबाबतीत महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकतील. अशा प्रकारचे प्रयोग गेल्या अनेक दशकांत झाले. भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतीमाल निर्माण करणारा देश म्हणून गणना झाली आहे.
 
ग्रामव्यवस्थेचा पगडा
 
तरीही गाय, म्हैस, बैल यांचे शेती व्यवस्थेत काय स्थान आहे? आज गाईचे राजकीय भांडवल होत आहे. याचा सारासार विचार करावा लागेल. भारतासारख्या विशाल लोकशाही देशात ग्रामव्यवस्थेचा पगडा मोठ्या प्रमाणात आजही शाबूत आहे. शेतीचा विचार करता ग्रामीण, आदिवासी अशा दुर्गम पट्ट्यात शेती संस्थेतील पशुधनाचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. ती होण्याची शक्यताही नाही. या अंगाने विचार केल्यास प्रेमचंद यांनी उपस्थित केलेले अनेक प्रश्न आज गैरलागू होतील असे वाटत नाही. गोदान या कादंबरीचा या अनुषंगाने विचार करायला हवा. वास्तववादी कथनातून भारतीय ग्रामीण जीवनाचे चित्रण हे या कादंबरीतून आधुनिक भारतीय इतिहासात प्रथमच झालेले होते. हाच या कादंबरीचा गाभाही आहे. या कादंबरीचा प्रभाव म्हणूनच नंतरच्या भारतीय साहित्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
 
या कादंबरीत ग्रामजीवन आणि शहरजीवन यातील भेदात्मक दर्शन आहे. त्यात मालती आणि फिलॉसॉफीचे प्राध्यापक मेहता यांची प्रेम कहाणी आहे; पण ती पारंपरिक नाही. ते दोघेही विवाह न करता आपल्या स्वातंत्र्याचा अवकाश अबाधित ठेवतात. पती-पत्नी म्हणून त्यांचे संबंध राहत नाहीत; पण तरीही एकत्र राहून त्यांच्या क्षेत्रातील ते काम करतात. ग्रामीण भागातील रुग्णसेवा हे काम मालती करते, तर मेहता हे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ लिहितात.
 
प्रेमचंद यांनी स्त्री-पुरुष नात्याचे नवे दर्शन या कादंबरीत घडवले आहे. १९८० नंतर आपल्याकडे स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागले; पण पन्नास वर्षांपूर्वी प्रेमचंद यांनी स्त्री-पुरुष समतेचा हा पट मांडला होता. विवाहाच्या बंधनात अडकल्यामुळे स्त्री-पुरुष आपला अवकाश गमावून बसतात. हे स्वातंत्र्याचे सूत्र १९३६ मध्ये प्रेमचंद्र यांनी सांगितलेले आहे. स्त्री-पुरुष नात्याच्या संदर्भातील ही गोष्ट आपणाला प्रेमचंद हे स्वतःच्या काळाच्या किती पुढे होते हे सांगते.

Related Articles