बर्ट्रान्ड रसेल आणि निरीश्वर वाद   

परामर्श , डॉ.दीपक बोरगावे 

रेने देकार्त (१५९६-१६५०) यांनी युरोपमध्ये आधुनिक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. विवेकनिष्ठ विचारसरणीची ही सुरुवात होती. यातून जगभर खळबळ माजली. मार्टिन ल्युथर, चार्ल्स डार्विनी आणि गॅलिलिओनी धर्म संस्थेला धक्का दिला. नंतर कान्ट, हेगल, आणि मार्क्स यांनी तत्त्वज्ञान क्षेत्रात मूलभूत क्रांतिकारक तत्त्वज्ञान मांडले. फ्रेडरिक नित्सेनी देवाचा अंत झाला आहे असे जाहीर केले. आपल्याकडे प्राचीन काळापासून बुद्ध आणि चार्वाक यांनी हा विचार दिला होता. तरीही, निरीश्वरवाद आपल्याकडे रुजला नाही. बर्ट्रान्ड रसेल (१८७२-१९७०) यांचे व्हाय आय एम नॉट अ ख्रिश्चन? हे ६ मार्च १९२७ रोजी दिलेले भाषण आहे. यात निरीश्वरवादाची चर्चा आहे. रसेलने ख्रिश्चॅनिटीबद्दलच संशय व्यक्त केला आहे. देव, अमरत्व यावर त्यांचा विश्वास नाही. येशूमध्ये असलेली विद्वत्ता आणि मानवतावादी मूल्ये याबद्दल त्यांना आदर आहे; पण देवाच्या अस्तित्वाबद्दल रसेलनी आक्षेप घेतले आहेत.
 
डार्विनच्या तत्त्वानुसार रसेलनी आपली मांडणी केली आहे. जगातील सर्वच धर्म हे आदिम भीतीचा आधार घेत सर्वसामान्य माणसाचे शोषण करण्याचे हत्यार म्हणून विकसित होत गेले. म्हणूनच धर्माच्या नैतिकतेबद्दलच त्यांनी मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत.ख्रिश्चन कोणाला म्हणायचे? या प्रश्नाने या निबंधाची सुरुवात होते. इथे आपणाला हिंदू, मुस्लिम, बुद्धिस्ट कोणाला म्हणायचे? असे प्रश्न विचारता येतील. एक सच्चा ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम किंवा बुद्धिस्ट असणे म्हणजे एक चांगल्या प्रकारची व्यक्ती म्हणून जीवन-व्यवहार करणे असे कोणीही म्हणेल.. पण हेच एका हिंदूला इस्लाम धर्माबद्दल विचारले, तर त्याचे नेमके उलटे उत्तर मिळू शकते. कोणत्याही धर्माची व्यक्ती त्या धर्माच्या अनुषंगाने तिची ओळख आवेशाने सांगत असेल, तर त्याचा अर्थ काय होतो? ख्रिश्चन धर्मभावना आणि अमरत्वावरचा विश्वास हा शब्दप्रामाण्यवाद आहे. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात येशू आणि मोहम्मद या व्यक्तींचा ईश्वर म्हणून उल्लेख होतो. इस्लाम ख्रिश्चनांप्रमाणेच अल्लाहवर आणि अमरत्वावर विश्वास ठेवते. हिंदू धर्माचा विचार केल्यास, इथे ३३ कोटी देवांचा प्रश्न आहे. हिंदूंमध्ये पुनर्जन्म ही एक श्रद्धा आहे. याच आधारे ख्रिश्चन आणि इस्लामप्रमाणे हिंदूंमध्ये अमरत्वाचा एक आधार सापडतो. व्यक्ती म्हणून येशूबद्दलच्या देवत्वाच्या काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर, येशू ही एक महान व्यक्ती होती, ही गोष्ट ख्रिश्चनांनी मान्य करायला पाहिजे असे रसेल यांचा आग्रह आहे. 

ईश्वराचे अस्तित्व?

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच रसेल शंका घेतात. विज्ञानाधिष्ठ सिद्धांताच्या दृष्टिकोनातून कुणी कोणाला निर्माण केले या प्रश्नाचे उत्तर देताना, देवाला कोणी निर्माण केले? हा प्रश्न तर्कनिष्ठ वाटतो. प्रत्येक धर्मग्रंथांत याबद्दल अतर्कीक आणि काल्पनिक कथा आहेत. बायबलमधील कथा प्रसिद्धच आहे. हिंदू धर्मात विष्णू अवताराची कथा आहे. हे जग कधीतरी विश्वाच्या इतिहासात निर्माण झाले आणि त्याचा विकास झाला, ही गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून मान्य करावी लागेल.
 
ईश्वराचे अस्तित्व आणि जग निर्मितीचा सिद्धांत हा अठराव्या शतकापासून कोसळत गेला. पुढे गॅलिलिओ, डार्विन, न्यूटन आणि आईन्स्टाईन यांच्यामुळे वैज्ञानिक तथ्यांना मान्यता मिळत गेली. तरीही, धर्माच्या बुरख्याखाली नैतिक मूल्यांचा गोंधळ सुरू राहिला. हा द्वंद्व ईश्वराचे अस्तित्व मानणारे अस्तिकवादी आणि ईश्वराचे अस्तित्व न मानणारे निरीश्वरवादी अशा दोन गटांत होता. विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही ईश्वरवाद्यांनी तो टिकवून ठेवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. धर्माचा नैतिकदृष्ट्या विचार ही गोष्ट कान्टने (१७२४-१८०४) प्रथमतः Critique of Pure Reason (१७८१) या ग्रंथात मांडली. नंतर धर्म, देव या संकल्पनांचा तो आधार बनत गेला. यासाठी युक्तिवाद करण्यात आले. उदाहरणार्थ, या जगात न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ईश्वराची आवश्यकता आहे. सत् (Good) हा नेहमी पराजित होतो, तर असत् (Evil) विजयी होतो. म्हणून या पृथ्वीतलावरील सत् आणि असत् या द्वंदात समतोल राखण्यासाठी नैतिक तत्त्वांचे समर्थन करणारे विचार रूढ होत गेले. पुढे चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२) यांच्या The Origin of Species (१८५९) मधील संक्रमण सिद्धांतामुळे ईश्वर अस्तित्वाच्या अनेक मिथकांचे भंजन (Demystification) झाले. वेगवेगळ्या कालखंडात अस्तित्वात असणार्‍या प्राण्यांनी त्याच्या काळातील पर्यावरणाला प्रतिसाद देत स्वतःचे जगणे आणि जीवन टिकवण्याचा प्रयत्न केला. जे यात यशस्वी झाले नाहीत, ते निसर्गात टिकू शकले नाहीत. डायनासोर याचे एक प्रसिद्ध उदाहरण नेहमी दिले जाते. जगाची निर्मिती ही नैसर्गिक घटना असून, धर्म सिद्धांतांच्या अनुषंगाने रुजलेला ईश्वरवादी विचार विसाव्या शतकात जवळपास लोप पावला.
 
येशू यांनी व्यक्ती म्हणून काय सांगितले? येशूंनी सांगितलेल्या गोष्टी विवेकनिष्ठ व्यक्ती मान्य करतीलही असे एक रसेलचे एक विधान या निबंधात आहे. येशू यांचे एक वाक्य नेहमी उद्धृत केले जाते : ३९;ठशीळीीं पेीं र्शींळश्र, र्लीीं ुहेीेर्शींशी ीहरश्रश्र ीाळींश ींहशश ेप ींहू ीळसहीं लहशशज्ञ, र्ीीींप ीें हळा ींहश ेींहशी रश्रीे.३९; आता हे तत्व चीनी प्राचीन तत्वज्ञ लाओ त्सू (इ. स. पूर्व सहावे शतक) आणि महात्मा गौतम बुद्ध यांनी येशूच्या अगोदर म्हणजे चार-पाचशे वर्षे पूर्वीच सांगितले होते. ख्रिश्चन समाज हे तत्व पाळत असेल काय? असा एक प्रश्न इथे नक्कीच पडतो. ख्रिश्चॅनटीचा विचार करणार्‍या न्यायाधीशांनी हे तत्व पाळलेले नाही, असे रसेल म्हणतात. येशू यांच्या शिकवणीचा बायबल या धर्मग्रंथात चर्चा येते. यातील बर्‍याच गोष्टी रसेलना मान्य नाहीत.
 
लोक धर्माचा स्वीकार का करतात? असे होण्याचे प्रमुख कारण भावनात्मक आहे. धर्मावर टीका करून काय करणार? चांगली व्यक्ती कशी असावी? सद्गुण कसे प्राप्त करावेत? याबद्दल जर काही धर्म शिकवत असेल तर, धर्माला नाकारण्यात काही अर्थ नाही, असा हा युक्तिवाद असतो. धार्मिक लोक चांगली व्यक्ती म्हणून वर्तन करतात का? ते सद्गुणी असतात का? ख्रिश्चॅनटीचा इतिहास हा युद्ध, हिंसा, अत्याचार, आक्रमण, साम्राज्य, सत्तेचा विस्तार, धर्मप्रसार, स्वतःच्या फायद्यासाठी व्यापार आणि वेगवेगळ्या देशांत वसाहती स्थापन करणे, अशा गोष्टी ख्रिश्चन धर्मीयांनी केल्या आहेत. जवळजवळ सर्वच धर्मानी धर्मप्रसारासाठी राजसत्तेचा वापर केला आहे. पापभीरूता, भोळेपणा, अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनेक अनिष्ट रुढी, अंधश्रद्धा व परंपरा प्रचलित केल्या आहेत. जगातील कोणताही धर्म त्याला अपवाद नाही.
 
माणसाच्या मनात घर करून राहिलेली भीती हाच धर्माचा प्रमुख आधार आहे. पराभवाची भीती, मरणाची भीती, अद्भुत गोष्टींची भीती. भीती हीच गोष्ट क्रूरतेचा स्रोत आहे. धर्म, भीती, दहशत आणि क्रूरता या हातात हात घालून जाणार्‍या आहेत. मग तो धर्म कोणताही असो. विज्ञानाने आपणाला भीतीवर मात करण्याची शिकवण दिली. विज्ञानाचा मंत्र आपण लक्षात घ्यायला हवा. जगात चांगली तथ्ये आणि वाईट तथ्ये आहेत. विवेक, विज्ञाननिष्ठ विचारधारा, बुद्धिमत्ता या आधारावर आपण भीतीला दूर सारले पाहिजे. ईश्वरवाद, पाप नावाची संकल्पना ही धर्मसंस्थेच्या शोषणाची हत्यारे आहेत. धर्मश्रद्धांचा संबंध हा ईश्वरवादी संकल्पनांशी आहे.
 
निरीश्वरवादाच्या अंगाने रसेलनी उपस्थित केलेले प्रश्न मूलभूत आहेत. पाश्चात्य जगामध्ये ही परंपरा पंधराव्या-सोळाव्या शतकात सुरू झाली. आपल्याकडे तर प्राचीन काळापासून बुद्ध, चार्वाक त्यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा बसवेश्वर, फुले आणि आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचते. तरीही, धर्माचे स्तोम आजच्या अतीप्रगत जगात समाज, चित्रपट, कला व इतर माध्यमातून माजवले जाते. नेमक्या अशावेळी विवेकनिष्ठ लोकांची नैतिक जबाबदारी वाढत जाते.
 

Related Articles