बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा   

आम्हाला पाकिस्तानी समजू नका, भारताला विनंती 

क्वेट्टा : बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानचा कधीच भाग नव्हता. गेल्या अनेक दशकांपासून आम्ही पाकिस्तानचे हवाई बाँब हल्ले, अपहरण आणि  वंशभेदाचे शिकार झालो आहोत, असे सांगत बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा बलुच नेते मीर यार बलूच यांनी बुधवारी केली. भारत सरकारने देखील आम्हाला यापुढे पाकिस्तानचे नागरिक मानू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. 
 
बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा मीर बलुच यांनी एका मुलाखतीत केली. ते म्हणाले, ब्रिटिशांची राजवट असताना ११ ऑगस्ट १९४७ रोजी आम्ही स्वतंत्र देश असल्याचे जाहीर केले होते. भारताच्या संरक्षणासाठी झटत  असणारी भारतीय देशप्रेमी माध्यमे, यूटयूबर आणि बुद्धिजीवी यांना मी आवाहन करतो की, आम्ही पाकिस्तानी नागरिक नाही आहोत. आम्ही पाकिस्तानी बलुचिस्तानी आहोत. पाकिस्तानातील पंजाबी नागरिक कधीही बाँब हल्ले, अपहरण किंवा वंशभेदाचे शिकार झालेले नाहीत, या उलट अशा स्थितीचा आम्ही सामना केला असल्याचे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणि सैन्य संघर्षावेळी बलुचिस्तान आणि बलुची नागरिकांनी भारताला पाठिंबा दिला आहे, असे सांगताना मीर म्हणाले, द पीपल ऑफ डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानने भारताला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला. पण, बलुचिस्तान आणि नागरिकांनी भारत सरकारला पाठिंबा दिला होता ऑपरेशन सिंदूर कारवाई केली तेव्हा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण एकटे नव्हते. त्यांच्या पाठीशी ६० दशलक्ष बलुची देशप्रेमी नागरिक होते. 

अनेक दशकांपासून हाल आणि अन्याय 

गेल्या अनेक दशकांपासून बलुचिस्तानला पाकिस्तानने सावत्रपणाची वागणूक दिली. तेथील साधनसंपत्तीचा लाभ स्थानिकांना मिळवून दिला नाही. महसूल वसूल केला. मात्र, त्याचा हिस्सा दिला नाही. मानवी हक्काची पायमल्ली करुन वंश निर्मूलनाचे कार्य पाकिस्तानी सैन्याने केले. हवाई बाँब हल्ले, अपहरण करुन अनेक नेत्यांना ठार केले. पाकिस्तानी सैनिकांसह दहशतवाद्यांनी बलुचिस्तानात हत्याकांड घडवून आणले आहे,. जाळपोळीच्या अनेक घटनांचे शिकार नागरिक झाले आहेत. मात्र, त्याला माध्यमांनी वाचा फोडली नाही आणि कायदेशीर पाठबळ मिळाले नसल्याने न्यायही मिळाला नाही.
 

Related Articles