राष्ट्रपतींकडून नीरज चोप्राला सैन्य दलात मोठी जबाबादारी   

मुंबई : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळली असल्याने सीमारेषेवरील तणाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, भारताची दहशवाद्यांविरुद्धची आणि पीओके संदर्भातील लढाई सुरूच राहणार आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम बंद केली असून तात्पुरती स्थगित केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना स्पष्ट केले. 
 
दरम्यान, सैन्य दलाच्या कामगिरील पंतप्रधान नरेंद मोदींसह देशाच्या १४० कोटी नागरिकांनी सॅल्यूट केला आहे. सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि दिग्गजांनी भारतीय सैन्य दलाचे कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे. आता, गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राही त्याच भारतीय सैन्य दलाचा भाग होणार आहे. नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आला आहे. नीरज चोप्राने भाला फेंक प्रकारात उत्तुंग कामगिरी करत जगभरात तिरंगा फडकवला होता. आता, त्याला सैन्य दलाची वर्दी मिळणार आहे. 
 
नीरज चोप्राने टोकिया येथील ऑलंपिक २०२१ मध्ये जेवलिन थ्रो म्हणजे भाला फेक क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकले होते. आता, नीरजला भारतीय सैन्य दलात लफ्टनंट कर्नल का पदाचा बहुमान देण्यात आला आहे. भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन १९४८ च्या  नुसार नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्य दलात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापू्र्वी नीरज चोप्रा राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते. सन २०१६ साली ते नायब सुभेदार पदावर भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. 
 
आता, त्यांना बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल बनले आहेत. नीरजच्या अगोदरही काही खेळाडू टेरिटोरियल आर्मीचे घटक आहेत, त्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हाही टेरिटोरियल आर्मीत लेफ्टनंट कर्नल आहे. दरम्यान, नीरज चोप्राने भारतासाठी २०२१ च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण आणि २०२४ च्या पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत सिल्व्हर पदक जिंकले आहे. नीरजने याच वर्षी टेनिस खेळाडू हिमानी मोर हिच्यासोबत लग्न केले. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नीरज चोप्राच्या एका सोशल मीडियावर पोस्टवरुन त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर,  मी सहसा खूप कमी बोलतो, परंतु जेव्हा माझ्या देशाच्या, माझ्या कुटुंबाच्या आणि सत्याचा प्रश्न येतो तेव्हा मी गप्प राहू शकत नाही, असे म्हणत नीरज चोप्राने स्पष्टीकरण दिलं होतं. पाकिस्तानचा भाला फेक पटू अर्शद नदीमला मी दिलेले निमंत्रण हे एका खेळाडूकडून दुसर्‍या खेळाडूला देण्यात आलेलं निमंत्रण होतं आणि त्याचा उद्देश भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवणे हा होता. 
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सोमवारी सर्व खेळाडूंना या कार्यक्रमाची निमंत्रणे पाठविण्यात आली. या पोस्टमध्ये नीरजने स्पष्ट केले की, पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीमुळे अर्शदचा सहभाग रद्द करण्यात आला आहे. ’नीरज चोप्रा क्लासिक’ कार्यक्रमात येण्यास अर्शदने नकार दिला होता हे लक्षात ठेवा, असंही नीरज चोप्राने म्हटलं आहे.
 

Related Articles