पाकिस्तानी सैन्याची दहशतवाद्यांना साथ   

भारतीय सैन्य दलाने पुन्हा फाडला पाकिस्तानचा बुरखा

भारताचे सर्व लष्करी तळ सुरक्षित ; यंत्रणा पूर्णपणे सज्ज

नवी दिल्ली : पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने सहज परतावून लावले. भारतीय हवाई संरक्षण प्रणाली अभेद्य असून सर्व लष्करी तळ सुरक्षित आणि पूर्णपणे सज्ज आहेत. गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी ते तयार आहेत, असे हवाई कारवाई महासंचालक, एअर मार्शल ए.के. भारती यांनी सोमवारी येथे सांगितले. आमची लढाई दहशतवादी पायाभूत सुविधा आणि दहशतवाद्यांशी होती. पण, पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना साथ दिली. त्यामुळे संघर्ष वाढला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी त्यांनी स्वदेशी ‘आकाश’ संरक्षण प्रणालीच्या उत्तम कामगिरीचेदेखील विशेष कौतुक केले. एकीकृत हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणालीने पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्यांना हाणून पाडले.पाकिस्तानच्या याचनेस प्रतिसाद देत भारताने शनिवारी सायंकाळी सशस्त्र हल्ले थांबविले. मात्र, रात्री उशिरा पाकिस्तानकडून पुन्हा हल्ले झाले. त्यास भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर, भारताने पाकिस्तानला अंतिम इशारा दिला. तेव्हापासून पाकिस्तानकडून कोणतीही कुरापत पाहायला मिळाली नाही. त्यामुळे, जम्मू-काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रविवारी कोणताही गोळीबार अथवा तोफांचा भडिमार पाकिस्तानकडून झाला नाही. त्यामुळे, मागील अनेक दिवसांनंतर रविवारची रात्र शांत पाहायला मिळाली, असे भारतीय लष्कराने सांगितले.
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर, दोन्ही बाजूंकडून जोरदार सशस्त्र संघर्ष पाहायला मिळाला. भारताने पाकिस्तानचे सहा विमानतळ उद्ध्वस्त करतानाच १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या संर्घषात ४० पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.भारताकडून पहिल्या दिवसापासूनच पाकिस्तानविरोधातील कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत दिली जात आहे. त्याप्रमाणे कालदेखील माहिती देण्यात आली. यावेळी हवाई दलाने पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाडला.आमची लढाई दहशतवाद्यांशी आणि त्यांनी उभारलेल्या आधारभूत पायाभूत सुविधांशी आहे. पाकिस्तानी सैन्यांशी नाही; पण पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांची साथ दिली. ज्यामुळे आम्हालाही चोख प्रत्युत्तर द्यावे लागले, असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले.   
 

Related Articles