भारतीय लष्कराची गर्जना रावळपिंडीपर्यंत : राजनाथ   

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर अंतर्गतची कारवाई पाकिस्तानी लष्करी तळावरच नव्हे तर त्याची गर्जना रावळपिंडीतील पाकिस्तानच्या लष्कराच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले. लखनौ येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. सिंह म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पत्नीचे सिंदूर हिरावून घेणार्‍या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने हल्ले करुन शिक्षा दिली आहे. त्या माध्यमांतून मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खावर फुंकर घातली आहे.  
 
ते म्हणाले, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचे देशाने स्वागत केले. तसेच सैन्याच्या कारवाईचे कौतुक करुन अभिनंदन केले. कारवाईमुळे भारतीय सैन्याच्या शक्ती, तसामर्थ्याचे तसेच क्षमतेचे दर्शन घडले. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविले होते. भारताने पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केलेले नाही. या उलट पाकिस्तानने नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवर देखील हल्ले केले. कारवाईत केवळ पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष केले. केवळ सीमावर्ती भागातील ठिकाणे नव्हे तर रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर हल्ले केले होते. दहशतवादी कारवाया केल्यास जशास तसे उत्तर देईल, असे भारताने आता जगाला दाखवून दिल्याचे ते म्हणाले.
 

Related Articles