सध्याच्या राजकारणाची दिशा चिंताजनक : डॉ. मोरे   

सातारा, (प्रतिनिधी) : सध्याच्या राजकारणाची एकूण दिशा अत्यंत चिंताजनक आहे. आयाराम गयाराम या नित्याच्या प्रकारामुळे लोकांत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर यांच्यासारख्या निष्ठावंत व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व अत्यंत मोलाचे ठरते, असे प्रतिपादन थोर विचारवंत व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
 
स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे येथील न मारुती मंदिरात आयोजित जयंतीदिन समारंभात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांना स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब साखवळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने डॉ. मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सुरेश साखवळकर, त्रिपुटी मठाचेश्रीपाद महाराज घोलप, लोकमंगल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस पतिष्ठानचे अध्यक्ष एम. बी. भोसले, सखवळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  भोसले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माणिकराव भोसले उपस्थित होते. महात्मा गांधींच्या प्रत्येक चळवळीत भाग घेत, सातत्याने दीर्घकाळ तुरुंगवास भोगलेला असताना स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेच्या राजकारणापासून कोसो दूर राहून समाजसेवेसाठी स्वतःलाझोकून देणार्‍या दादासाहेब साखवळकरांसारखी ध्येयवादी मंडळीहाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यांच्या कार्यामुळेच एकसळ गावाचे नाव स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात लौकिक संपन्न झाले, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले. एका निष्ठावान व तपस्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने सन्मान होत असल्याबद्दल डॉ. न. म. जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. मोरे यांच्या हस्ते श्रीमंत पवार, संतोष भोसले, बाळासाहेब फडतरे, मधुकर यादव, पुरुषोत्तम जगताप, नंदकुमार माळवदे, परशुराम सुतार, माणिक भोसले यांचा सन्मान करण्यात आला.

Related Articles