विनापरवाना प्रवासी वाहतूक चालकाला भोवली   

पुणे : विनापरवाना प्रवाशांची वाहतूक करणार्‍या चालक आणि मालकावर पुण्यातील मोटार वाहन न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने या दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दोघांनाही प्रत्येकी सात दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे त्यांची रवानगी तात्काळ येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
 
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) केवळ वाहने जप्त करण्याची आणि मोठा दंड आकारण्याची कारवाई होत होती. परंतु, हे प्रकरण जेव्हा मोटार वाहन न्यायालयात गेले, तेव्हा न्यायालयाने चालक आणि मालक दोघांनाही दंड आणि
तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे या कारवाईची पुण्यातील वाहनचालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
 
पुणे आरटीओच्या जलद गती असलेल्या पथकाने एका चारचाकी वाहनाला वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडले. त्यानंतर, पुढील कार्यवाहीसाठी आरटीओच्या खटला विभागाने हे प्रकरण मोटार वाहन न्यायालयात सादर केले. मोटार वाहन न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वाहनाचा परवाना (प्रवासी वाहतूक परमिट) आणि चालकाकडे आवश्यक लायसन्स नसल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे नमूद करत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. याचमुळे न्यायालयाने ही पुण्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनुसार, चालकाला १५ हजार रुपये दंड आणि ७ दिवसांचा तुरुंगवास, तर गाडीच्या मालकालाही १५ हजार रुपये दंड आणि ७ दिवसांचा तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली. दोघांनाही येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. आरटीओ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मोटार वाहन कायदा १९२ ए आणि १८१ नुसार करण्यात आली आहे.
 
नियम मोडल्यास कारवाई 
 
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा आमचा निर्धार आहे. ही कारवाई त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. परवाना आणि लायसन्सशिवाय प्रवासी वाहतूक करणे हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे आणि यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. यापुढेही जे कोणी नियम मोडतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 
 
- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
 
प्रशासनाने नियमांविषयी जनजागृती करावी
 
न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आरटीओने वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढवण्याची गरज आहे. कठोर कारवाईसोबतच मार्गदर्शन आणि समुपदेशनही महत्त्वाचे आहे. या कठोर कारवाईमुळे पुण्यातील इतर वाहनचालकांमध्ये नक्कीच खळबळ उडाली असेल. आता वाहतूक नियम मोडण्यापूर्वी अनेकजण विचार करतील. ही कारवाई वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा संदेश देत आहे. 
 
- एकनाथ ढोले, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना, पश्चिम महाराष्ट्र

Related Articles