आरोग्य यंत्रणांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात   

पुणे : जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, कावीळ, टायफॉइड यांसारख्या किटकजन्य, जलजन्य साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्व तालुक्यांतील आरोग्य यंत्रणांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.
 
पुराच्या पाण्यामुळे, चिखलामुळे दुर्गंधी सोबत साथीचे आजार फैलावण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुराचे पाणी शिरलेल्या गावांमध्ये तातडीने स्वच्छता करून डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून, धुराद्वारे डासांची फवारणी तसेच किटकनाशक पावडर टाकण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. यांसह पाण्याच्या स्रोतांची निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य विभागाचे पथक व इतर अनुभवी कर्मचारी यांचे करून संभाव्य रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.
 
जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकार्‍यांना त्यांच्या भागात धूर फवारणी आणि पावडर टाकण्यास सांगितले आहे. तसेच पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी तातडीने उपाय केले जाणार आहेत. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साथीचे आणि संसर्गजन्य रोग पसरू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

Related Articles