पुण्यात जोरदार पाऊस   

उकाड्यावर पावसाची मात्रा; पुणेकरांना दिलासा 

पुणे : ढगाळ वातावरणासह पडलेल्या जोरदार पावसामुळे शुक्रवारी दुपारी शहरातील मध्य वस्तीसह उपनगरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश व्यवहार ठप्प झाले. सुमारे आर्धा ते पाऊन तास पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर मात्र वाहनांना तसेच नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. 
 
शहर आणि उपनगरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमाराला जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरूवात झाली. बर्‍याच ठिकाणी नाले भरून वाहत होते. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आहे, त्याच ठिकाणी थांबावे लागले, तर वाहन चालकांनाही वाहने कडेला लावून आश्रयाला थांबावे लागले. शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून उष्ण व दमट वातावरणामुळे उकाडा वाढला होता. ढगाळ वातावरणासह पडलेल्या जोरदार पावसामुळे उकाडा कमी झाल्याने पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. 
 
मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड शहरात उकाडा जाणवत होता. ऊन्हामुळे पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती. पुणे शहर आणि परिसरासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला होता. पुण्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार काल दुपारपासून उपनगरात पावसाला सुरुवात झाली. कात्रज, कोंढवा, वारजे, हडपसर, धायरीसह मध्यवसतीतील बहुतांश पेठांमध्ये जोरदार पाऊस पडला. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊस थांबल्यानंतर अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. 
 
गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवू लागला होता. दुपारच्या वेळेत जोरदार वारेही सुटत होते. तसेच मधेमधे ढगाळ वातावरण तयार होत होते. अखेर काल पावसाला सुरुवात झाली. पावसाने वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. या पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर शहर आणि परिसरात हलके ऊन पडले होते.
 
ऊन पडल्याने रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. पुणे व परिसरात पुढील चार दिवस आकाश अंशत: ढगाळ असणार आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवसांसाठी यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. 
 
राज्यात चार दिवस पाऊस कायम 
 
संपूर्ण राज्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात चार दिवस मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. काही भागात ३ ते४ अंशाने तपमान वाढणार आहे. त्यानंतर राज्यात निर्माण झालेले पावसाळी वातावरण निवळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
शहरात पडलेला पाऊस 
 
ठिकाण                   पाऊस 
हडपसर                १७.५ मिमी
पाषाण                   १७ मिमी
शिवाजीनगर           ११.२ मिमी
कोरेगावपार्क ६ मिमी
मगरपट्टा                १ मिमी
लोहगाव                 ०.८ मिमी

Related Articles