पावसाचा हजारो पर्यटकांना फटका   

सिक्कीमला गेलेल्या हजारो पर्यटकांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात अठरा वाहनांतून १०० पर्यटकांची उत्तरेकडील लाचंग येथून सुटका करण्यात आली आहे. त्यांना लोअर झोंगू फिंडांग येथे आणले गेले आहे. 
 
मांगनचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांच्या नेतृत्वाखाली पर्यटकांची वाहने फिडांग येथे आणली आहेत. यानंतर  पर्यटक गंगटोकडे रवाना होतील. दरम्यान, पर्यटकांच्या सुटकेचे काम काल सकाळपासून हाती घेतले होते. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि लष्कर, बीआरओ, इंडो तिबेटियन पोलिस दल, वन विभाग, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी पर्यटकांच्या सुटकेसाठी धाव घेतली. दरम्यान, अन्य पर्यटक वाहनांच्या ताफ्यात २८४ वाहने आणि १६ दुचाकी आहेत. १ हजार ६७८ पर्यटकांमध्ये ७३७ पुरुष, ६६१ महिला आणि ३८० मुले आहेत. ही सर्व मंडळी थंेंंग तपासणी नाका ओलांडून फिडांगकडे रवाना झाली आहेत. 
 
जिल्हाधिकारी जैन यांनी सांगितले की, पर्यटकांच्या सुटकेसाठी सर्व ते प्रयत्न युद्धपातळीवर केले जात आहेत. पर्यटकांना लाचुंग येथून सुरक्षित बाहेर काढले जात आहे. ते लाचुंंग -चुगंथंग- सिफग्यार- फिडांग मार्गे गंगटोकडे येत आहेत  पर्यटक प्रामुख्याने मुसळधार पावसामुळे लाचुंंग येेथे अडकले आहेत. मांगन जिल्ह्यातील दोन पुलांचे नुकसान झाले. उत्तर सिक्कीमध्ये ३० मे रोजी ढगफुटी झाली होती. त्यानंतर मुसळधार वृष्टी झाली होती. त्याचा परिसराला आणि पर्यटकांना मोठा फटका बसल्याचे बीआरओच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस अधिकारी अक्षय सचदेव यांनी लाचुंग येथून आलेल्या पर्यटकांचे स्वागत केले.  या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी ताशी वँग्याल, गंगटोकेचे वरिष्ठ अधिकारी प्रताप प्रधान, पोलिस अधीक्षक मांगन डेटचू भुतिया आदी उपस्थित होते. 
 

Related Articles