E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
काकोरी कटाचे सूत्रधार अशफाक उल्ला खान
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
गाऊ त्यांना आरती,गिरीष चिटणीस
अशफाक उल्ला खान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांच्या बलिदानाने, त्यागाने आणि धैर्याने स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्याला नवा प्रेरणास्त्रोत मिळाला. काकोरी कटाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिले की, देशासाठी धर्म, जात, भाषा यापेक्षाही महत्वाचे काय असेल, तर ती देशभक्ती. लेखक आणि विशेषतः उर्दू भाषेचे कवी असलेल्या अशफाक खान यांनी असे म्हंटले आहे की,....’अरे माझ्या मातृभूमी, मी फक्त तुझी सेवा करण्यासाठी जगतो. मला जन्मठेपेची शिक्षा झाली असो, किंवा मृत्यूदंडाची शिक्षा झाली असो, मी माझ्या हातांनीही तुझे गौरव गाईन. मृत्यू एकदाच येतो, त्याची भीती का बाळगायची?’
अशफाक हे जातीने पठाण मुसलमान शाहजहानपूरला रहात. गर्भश्रीमंत अमीराच्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला होता. पंडित रामप्रसाद बिस्मिल यांचे ते भक्त क्रांतीकार्यात शिष्य होते. काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये ते प्रमुख सूत्रधार होते. काकोरी प्रकरणात भाग घेण्याच्या वेळी ते विद्यार्थी जीवनच व्यतीत करीत होते. त्यांच्यावर काकोरी रेल्वे दरोडा प्रकरणी ब्रिटीश शासनाचे वॉरंट निघाल्यावर ते काही दिवस गुप्त राहिले. या अज्ञातवासात पासपोर्ट मिळवून ते अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होते; पण भारताला जडलेल्या विश्वासघाताच्या रोगाने त्यांची शिकार साधली व दिल्लीच्या एका उपाहारागृहात पोलिसांनी त्यांना पकडले. १९ डिसेंबर १९२७ रोजी फैजाबाद तुरूंगात त्यांना फाशी देण्यात आली. त्यांचे वय २७ वर्षाचे होते. मृत्यूच्या सावलीत वधस्तंभाच्या परिसरात ते कविता गुणगुणत होते.
तंग आकर हम भी उन के जुल्म से बेदादसे |
चल दिए सूए अदम जिंदाने फैजाबाद से ॥
अशफाक उल्ला खान आणि पंडीत रामप्रसाद बिस्मिल यांची मैत्री ही स्वतंत्र भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक ठरली. अटक झाल्यानंतरही अशफाक यांनी कोणत्याही सहकार्याविरुद्ध कबुली दिली नाही. त्याचा आत्मसन्मान आणि निष्ठा अद्वितीय होती. उत्कृष्ट कवी असलेल्या अशफाक यांनी तुरूंगात असताना देशभक्तीपर कविता लिहिल्या. काकोरी रेल्वे लूट घटनेने ही केवळ आर्थिक लूट नसून ती एक प्रतिकात्मक क्रांती आहे हे दाखवून देत भारतांमध्ये तरूण देशासाठी प्राण देण्यास तयार आहेत ही बाब लोकांमध्ये देशभक्ती वाढवणारी ठरली. या घटनेमुळे तरुणांमध्ये क्रांतीची भावना उफाळून आली. काकोरी कट ही घटना केवळ एक रेल्वे लूट नव्हती, ती होती स्वातंत्र्याच्या मूल्यांची जळती मशाल. ही घटना भारतीय क्रांतीकारकांच्या धाडसाची, त्यागाची आपण बलिदानाची कहाणी होती. आजही काकोरी रेल्वे लुटीच्या त्या घटनेने भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे.
अलिशान बंगला जाळला
अशफाक उल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील शहीदगढ शाहजहानपूर येथे २२ ऑक्टोबर १९०० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मदशफीक उल्ला खान तर आईचे नाव मजदूरुन्निशॉ बेगम. एकीकडे वडिलांच्या खानदानात एकही जण पदवीधर होईपर्यंतचे शिक्षण प्राप्त करू शकला नाही आणि दुसरीकडे त्यांच्या आजोळी सर्व उच्चशिक्षीत होते. त्यातील काहीतर डेप्युटी कलेक्टर व सबज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पदावरही काम करत होते. १८५७ च्या गदर युद्धात आजोळच्या लोकांनी तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी साथ न दिल्याने इतर जनतेने रागाच्या भरात त्यांचा अलिशान बंगला आगीत भस्म करून टाकला. तो बंगला त्या शहरात आजही ‘जली कोठी’ या नावाने प्रसिद्ध आहे. अशफाक यांनी आपले बलिदान देऊन त्यांच्या आजोळच्यांच्या नावावरील कुरूप डाग कायमचं धुवून टाकला. अशपाक त्यांच्या पाच भावंडांमध्ये सर्वात लहान. १९१८ मध्ये ते सातवीत असताना पोलिसांनी त्यांच्या शाळेवर छापा टाकून मैनपुरी कटाच्या संदर्भात राजाराम भारतीय या विद्यार्थ्याला अटक केली, ज्यामध्ये कार्यकर्त्यांना इंग्रज शासनाविरोधी साहित्याच्या प्रकाशनासाठी निधी हवा असल्याने मैनपुरीमध्ये लूटमार केली होती. अटकेमुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांचा देशभक्तीमुळे चळवळीमधील सहभाग वाढला त्यात अशफाक खान यांचा समावेश होता. मैनपुरी लूटमारीपासून अशफाक यांचा भाऊ रियासत उल्ला यांनी त्यांना सांगितले कि, हल्ली पं. रामप्रसाद बिस्मिल शाहाजहानपूरमध्ये दिसत नाहीत. ते एक समर्थ व्यक्ती आणि उत्तम दर्जाचे कवीही आहेत. अशफाक तेंव्हापासूनच बिस्मिल यांच्या भेटीसाठी उत्सुक होते.
१९२३ मध्ये शचींद्रनाथ संन्याल व योगेशचंद्र चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ ची स्थापना झाली यामध्ये अशफाक उल्ला खान आणि पं. रामप्रसाद बिस्मिल यांचा प्रमुख सहभाग होता. शचींद्रनाथ संन्याल आणि योगेशचंद्र चॅटर्जी यांनी व इतरांनी १९२५ च्या जानेवारी महिन्यात ’हिंदुस्थान रिपब्लीकन असोसिएशन’च्या वतीने देशभर रिव्हॉलशनरी (ठर्शीेंर्श्रीींळेपरीू) या नावाने एक पत्रक वाटण्यात आल्याने भारतभर ब्रिटिशांविरुद्ध असंतोष नागरिकांच्यामध्ये निर्माण झाला. या पत्रकाच्या सूत्रबद्ध प्रचाराने राजसत्तेला कल्पना येऊन तिची निद्रा खाडकन उतरली. क्रांतिकार्य उभे करण्यासाठी नुकतेच जहाल पत्रके काढणे येवढेच उद्दिष्ट नसून जहाल कृत्ये करणे हे उद्दिष्ट असल्याने तसेच क्रांतिकारक चळवळीत मुरलेलेच लोक संस्थेत असल्यामुळे बाँबस तयार करणे व नवीन शस्त्रास्त्रे मिळविणे यात ते कुशल होते. पण त्यासाठी त्यांना आवश्यक तो धनसंचय मिळविण्यासाठी दरवडे घालणे हा एकच मार्ग उपलब्ध होता. साहसपूर्ण दरवडे घालून पक्षाची गरज भागविली. इंग्रज सत्तेची या दरवड्यामुळे धावपळ सुरु झाली आणि ब्रिटिश विरोधी कारवाया केल्याच्या कागदपत्रांच्या आधारे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे नेते शचींद्रनाथ संन्याल आणि योगेशचंद्र चटर्जी यांना पकडून त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकारी धनकोष लुटला
यानंतर या असोसिएशनने एक असें ज्वलंत साहस केले कि, क्रांतीकारक आंदोलन व त्यामागची विचारप्रणाली यांच्याकडे सर्व जनतेचे लक्ष आकृष्ट झाले ते म्हणजे काकोरी येथे रेल्वेगाडीवर हल्ला करून सरकारी धनकोश लुटला हे होय. असोसिएशनच्या नेत्यांना जहाजावरून गुप्त मार्गाने बराच शस्त्रसाठा मिळण्यासारखा होता पण शस्त्रे विकत घेण्यासाठी कित्येक हजार रुपयांची आवश्यकता होती. यासाठी प्रथम संस्थेच्या सदस्यांनी आपली घरे धुवून काढली. पण सार्या निष्कांचनांजवळ निघणार काय विशेष? अशा कामाविषयी सहानुभूती असणार्या लोकांकडून निधी गोळा करण्याचाही प्रयत्न केला पण त्याला फारसे यश आले नाही. शेवटी संघी जाऊ नये म्हणून रायबरेली जिल्ह्यातील सराय महेश नावाच्या गावात राजनैतिक दरवडाही घालण्यात आला पण आवश्यक तितके पैसे त्यातूनही उपलब्ध होऊ शकले नाहीत. शेवटी समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी ठराव मांडून सरकारी पोस्ट ऑफिसचा रेल्वेतून नेण्यात येणारा खजिना लुटण्यास संमती मिळवली. समितीचे एक श्रेष्ठ नेते अशफाक उल्ला खान यांनी या ठरावाला प्रथम या दरवड्यामुळे क्रांतीकारक या प्रदेशात सक्रीयपणे प्रभावशाली काम करीत आहेत हे या गोष्टीमुळे प्रकट होईल व आपली परिपूर्ण सिध्दता झाल्यांवाचून राजसत्तेला असे जागरूक करणे आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीनेच अहिताचे आहे असे सांगत विरोध दर्शविला. पण मन्मथनाथ गुप्त प्रभूति लोकांनी त्याला विरोध केला.
शेवटी सर्वानुमते काकोरी स्टेशनजवळ साखळी ओढून गाडी थांबवावी व सरकारी पैशाच्या पिशव्या पळवाव्या या योजनेसाठी पं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिडी, शचींद्रनाथ बक्षी, मुकुंदीलाल, मन्मथनाथ गुप्त, मुरारी शर्मा, बनवारीलाल व चंद्रशेखर आझाद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. ९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौपासून सहशनपूरला जाणार्या रेल्वे मार्गावरील आठ मैलावरील तिसरे स्टेशन असलेल्या काकोरी या ठिकाणी तिजोरी फोडण्याची साधने घेऊन या गाडीत सर्वजण बसले.या गाडीत रेल्वेच्या खजिन्याव्यतिरीक्त बंदुकीच्या पहार्यातून अजून एक खजिना जात होता. शिवाय या रेल्वेने काही इंग्रज सैनिकही सशस्त्र स्थितीत प्रवास करीत होते. एक इंग्रज मेजर सेकंड क्लास म्हणजे आजच्या फर्स्ट क्लास डब्यात होता. आपल्या दूतांकडून गाडीतील या सशस्त्र लोकांची उपस्थितीची माहिती मिळताच अशफाक उल्ला खान ने पुन्हा सर्वांना हे साहस न करण्याचे विनविले. पण ते तेजस्वी क्रांतीकारक आपल्या निश्चयापासून ढळण्यास तिळमात्र तयार नाहीत म्हंटल्यावर अशफाक, राजेंद्र लाहिडी, शचींद्रनाथ बक्षी हे दुसर्या वर्गाच्या डब्यात व उर्वरीत लोक पं. रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली दुसर्या डब्यात बसले. त्यांच्याजवळ चार नवीन मौजेर पिस्तूल व काडतुसांचा भरपूर साठा होता.
काकोरी स्टेशनवरून गाडी थोडी दूर गेल्यावर धोक्याची साखळी ओढून क्रांतीकारकांनी गाडी थांबवली आणि पैशाच्या थैली असलेल्या डब्यात शिरून तिजोरी खाली ढकलून दिली. पिस्तुल छातीवर रोखून गार्डला तोंड खाली करून जमिनीवर पालथे पडून रहाण्यास सांगितले. भक्कम तिजोरी फुटेना. अशफाक पहारा देत होता. व्यर्थ वेळ जात असल्याचे पाहून आपली पिस्तूल मन्मथनाथ गुप्तांच्या हातात देऊन आपल्या हातात घण घेऊन त्याने भीमप्रहार करत तिजोरी फोडली. क्रांतिकारक पैशाच्या थैल्या घेऊन त्या परिसरातील दाट झाडीत लपून बसले. रेल्वे गाडीतील मेजर, गोर्या शिपायांनी विरोध न करता आपापल्या डब्यात दारे लाऊन थांबणे पत्करले. वाटेत थैल्या उघडून त्यातील पैसे काढून लखनौ शहरात सावधपणे क्रांतिकारकांनी प्रवेश केला. या साहसात त्यांना पाच सहस्त्र रुपये मिळाले.
रोमांचकारी घटना
काकोरीच्या रोमांचकारी घटनेने ब्रिटीश राजसत्तेला जणू गदगदा हलवून जागे केले. दमनचक्रे अतिशय वेगाने फिरून चाळीस व्यक्तींना पकडण्यात आले. चंद्रशेखर आझाद, अशफाक खान व शचींद्र बक्षी फरारी झाले. २६ ऑक्टोबर १९२५ च्या सकाळी पं. रामप्रसाद बिस्मिला यास पोलिसांनी पकडले. अटक टाळण्यासाठी अशफाक खान नेपाळला पळून गेले. नेपाळहून ते कानपूर आणि नंतर डाल्टनगंजला गेले आणि तेथे एका अभियांत्रिकी फर्ममध्ये लिपिक म्हणून टोपण नावाने काम करीत होते. अखेर अशफाक खानने आपल्या क्रांतीकारी कारवाया सुरू ठेवण्यासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत असताना त्यांनी आपल्या शाहजहांपूरमधील एका पठाण मित्राची गाठ घेतली. ज्याने पोलिसांना त्यांचा गुप्तपणे ठावठिकाणा कळविला. ७ डिसेंबर १९२६ च्या सकाळी त्यांना दिल्ली पोलिसांनी पकडून अटक केली आणि फैजाबाद येथील जिल्हा कारागृहात बंद केले. शचींद्रनाथ संन्याल व योगेश चटर्जी कैदेतच होते. त्यांच्यावरही संघटनेचे नेतृत्व करणारे म्हणून या खटल्यात त्यांना गोवले. शचींद्रनाथ बक्षी यांनाही नंतर अटक झाली. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत सापडले नाहीत. आरोपींवर सम्राटाविरुद्ध युद्ध घोषित केल्याचे आरोप ठेवण्यात आले. सरकारच्या वतीने पंडित जगत् नारायणलाल हे वकील होते, तर आरोपींच्या वतीने पं. गोविंदवल्लभ पंत, बी. के. चौधरी, मोहनलाल सक्सेना व चंद्रभान गुप्त हे काम चालवीत होते. बरेच दिवस खटला चालून ७ एप्रिल १९२७ रोजी अशफाक खान यांच्यासह चार जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ डिसेंबरला अशफाक खान यांना फाशी देण्यात आली. याच दिवशी पं. रामप्रसाद बिस्मिल यांनाही फाशी देण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात अशफाक उल्ला खान यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य संग्राम अधिक जोमाने पुढे गेला आणि लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. अविवाहीत असणार्या अशफाक खान या स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी यांनी असा नारा दिला होता....
आजाद ही हो लेंगे, या सर ही कटा देंगे|
तुम हाथ उठाओगे, हम पैर बढा देंगे|
चरखे से जमी को हम, ताचर्ख गुंना देंगे|
है जान हथेली पर, एक दम में गवा देंगे|
Related
Articles
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात