पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)   

पाकिस्तानने नागरी वस्त्यांवरही हल्ले केले; मात्र भारतीय लष्कराने ते परतवून लावले. पाकिस्तानने अफवाही पसरविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशामधील तणाव वाढल्याने आगामी आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
विनाशकाले विपरीत बुद्धी, अशीच अवस्था आता पाकिस्तानची झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर आता पाकिस्तान पिसाळल्यासारखा वागत आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यापुरतीच क्षेपणास्त्रांची कारवाई मर्यादित ठेवली होती. नागरी भागाला कोणतीही हानी न पोहोचवणारी अशी ती कारवाई होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले असले तरी भारतीय लष्कराने ते हाणून पाडले आहेत. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देताना भारताने कराची, लाहोर, सियालकोट, मुरिदके या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. पाकिस्तानच्या एका हवाई तळावरून झेपावलेले त्यांचे एफ १६ हे लढाऊ विमान जागच्या जागीच पाडण्यात आले आहे. एफ १६ हे लढाऊ विमान अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त असे लढाऊ विमान समजले जाते. पाकिस्तानच्या हवाई दलाचा ते कणा समजले जाते. तेच भारताने पाडले आहे. हल्ले आणि प्रतिहल्ले यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला असून तोफगोळ्यांचा मारा पाकिस्तानने वाढवला आहे. त्यामुळे आता भारतीय लष्करही गप्प बसणार नाही. त्याचे सूतोवाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले आहेच. पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर मोहीम अद्याप संपलेली नाही. पाकिस्तानने चिथावणी दिल्यास आम्ही जबरदस्त प्रतिकारात्मक कारवाई करू असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे. पाकिस्तान विरोधात सरकारच्या या कारवाईला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला असून, या काळात सर्व पक्ष सरकारमागे ठामपणे उभे असल्याचे चित्र संपूर्ण जगाला दिसले आहे. पाकिस्तानच्या सर्व कारवाया हाणून पाडण्यास सरकारला त्यामुळे बळ मिळाले आहे. या उलट पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भूमिकेवर त्यांच्याच देशातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाकिस्तानी जनतेत याबद्दल रोषाची भावना आहे.
 
हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त
 
पाकिस्तानी सैन्याने परवा रात्री सीमेलगतच्या काही ठिकाणांवर केलेला हल्ला भारताने परतवून लावला. यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ती एस-४०० या संरक्षक क्षेपणास्त्राने. रशियाने विकसित केलेली, जमिनीवरून हवेत मारा करणारी ही आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. चारशे किलोमीटर पल्ल्यातील विमाने, ड्रोन यावर ती मारा करू शकते. एकाच वेळी ३६ लक्ष्यांवर हल्ला करण्याची तिची क्षमता आहे. पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून केलेला हवाई हल्ला याच एस्-४०० या सुरक्षा प्रणालीने अयशस्वी ठरवला. भारताने केलेल्या या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानची एचक्यू-९ ही सुरक्षा प्रणाली आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली. भारताने आतापर्यंत केलेल्या कारवाईत शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली. या दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानने सरकारी इतमामात आणि पाकिस्तानच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत केल्याने दहशतवाद्याप्रति त्यांची जवळीक जगाच्या नजरेस आली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश अशीच पाकिस्तानची ओळख आहे. तरीही पाकिस्तान आमचा दहशतवाद्यांशी संबंध नाही असे कसे म्हणू शकतो? भारताने केलेल्या कारवाईला आणि एकूणच दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेला जगातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चीननेदेखील पाकिस्तानचे कोणतेही समर्थन उघडपणे केलेले नाही. इस्लामिक देशाकडूनही भारताच्या कारवाईचा निषेध झालेला नाही. त्यामुळेच सीमेवरील तणाव कमी करायचा की नाही हे आता पाकिस्ताननेच ठरवायचे आहे.

Related Articles