भारतीय लष्कराने पाकिस्तानला जागा दाखविली   

पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला करून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २८ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. सर्वच स्तरातून या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून आता भारतीय लष्कराने ’ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी स्थळे उद्धवस्त केले. यामध्ये भारतीय लष्कराने जवळपास शंभरहून अधिक पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आता भारतीय लष्कराने पाकिस्तानला त्याची जागा दाखविली, अशा प्रतिक्रिया निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
 
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा भारतीय लष्कराने चांगलाच बदला घेतला. आता पाकिस्तान वर्षभर तरी भारतावर हल्ले करण्याचा धाडस करणार नाही. भारतीय लष्करांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील कौतुक करावसे वाटते. या हल्ल्यामुळे आता पाकिस्तान एकटा पडलेला आहे. बलुचिस्तान आणि तालिबान ही राष्ट्रे सुध्दा पाकिस्तानावर हल्ले करीत आहे. लष्कराने राबविलेल्या ’ऑपरेशन सिंदूर’ला अमेरिका, रशियासह अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारताची ताकद आणखी वाढली आहे. आता पाकिस्तानसह त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना चांगली धडकी भरली आहे. दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त करताना भारतीय लष्कराने एकाही पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केले नाही. यातच आपल्या लष्करांचे मोठे यश आहे. 

- पी. सी. वशिष्ठ, निवृत्त लष्कर अधिकारी

दहशतवादी स्थळांवर हल्ला करून भारतीय लष्कराने पाकिस्तानला जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. यासंदर्भात भारत सरकारने चांगली कामगिरी केली आहे. ’ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारतीय लष्कराने कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांवर हल्ले केले नाहीत. आता पाकिस्तान सुध्दा यापुढे भारतावर हल्ला करू शकतो. आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र, भारतीय सैन्यदल तयारीत आहे. भारताला जगातील अनेक राष्ट्रांनी पाठिंबा दर्शविला आहे. कुठलाही देश दहशतवाद्यांना खतपाणी घालणार नाही. यापुढे कधी भारतावर पाकिस्तानने आक्रमण केल्यास त्याचा अशाच पध्दतीने उत्तर दिले जाईल, यात शंका नाही. 

- प्रसाद जोशी, निवृत्त कर्नल

भारताने पहलगाम दहशतवादी हल्लचा बदला घेत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारतीय लष्कराने ’ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापुढे पाकिस्तान सुधारला नाही, तर भारत येणार्‍या काळात पाकिस्तानचे चार तुकडे करेल. एक भाग सिंध प्रांत, दुसरा भाग बलुचिस्तान, तिसरा फॅग्रेट हुफ्तुम कावा आणि चौथा भाग हा पंजाब राहील. हे निश्चितच आपल्याला येणार्‍या काळात पाहायला मिळणार आहे. 

- डी. बी. शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल

पहलगाम हल्ल्याला उत्तर देऊन जगात भारताने आपली क्षमता सिध्द करण्याचे काम केले आहे. हल्ल्यात ड्रोन आणि राफेलद्वारे चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. या कृतीमध्ये दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले आहे. सामान्य पाकिस्तानी नागरिकांना कोणतीही इजा नकरता हे उत्तर दिले आहे. दुसरीकडे या हल्ल्याची माहिती इत्तर देशांना देऊन वेगळी निती राबवण्यात आली. त्यावर आता पाकिस्तान उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अण्णवस्त्र हल्ल्याचा प्रकार देखील करेल. भारताने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केल्याने ते आता शक्य होणार नाही. 

- डॉ. सतिश ढगे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल 

 

Related Articles