भुईंज भागात वानरांमुळे पिकांची हानी   

आंबा, केळी, कोबी, मका, टोमॅटोचे नुकसान

सातारा, (प्रतिनिधी) : भुईंज येथील चाहूर, फुलेनगर शिवारात वानरांनी ठिय्या मांडला असून वानरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस या परिसरात वानरांचा उपद्रव वाढला आहे. उभ्या पिकांचे वानरे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
 
चाहूर येथे सुमारे तीस ते चाळीस वानरांची टोळी असून, आंबा, केळी, कोबी, मका, टोमॅटो, भुईमूग, ऊस, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. शेतातील उभ्या पिकात घुसलेले वानर शेतकरी हुसकायला गेल्यास ते शेतकर्‍यांच्या अंगावर धावून येतात. वानरांचा त्रास महिला व लहान मुलांनाही होत आहे. मळ्याकडे जाताना वानरे त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. या वानरांमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्याच्या तीव्र उन्हाळ्यातही शेतकरी भाजीपाला पिकविण्यासाठी पराकाष्ठा करत असून घाम गाळून मेहनतीने पिकविलेल्या भाजीपाल्याचे वानरे नुकसान करत आहेत. या परिसरात ओढ्याच्या काठी रात्रीच्या वेळी याच शिवारातील झाडांवर त्यांचा रात्री मुक्काम असतो. रात्री-अपरात्री हे वानर घराच्या पत्र्यावर उड्या मारत असल्याने झोपलेली लहान मुले घाबरत आहेत. या वानरांच्या सततच्या उपद्रवामुळे काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील मोठमोठी झाडेही तोडून टाकली आहेत. शेतातील सध्या काढणीस आलेल्या भुईमुगाच्या पिकाचे नुकसान वानरे करीत असून, एका रात्रीत दहा गुंठे भुईमूग सुपडासाफ करीत आहेत. 
 

Related Articles