अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री   

चौंडी, (अहिल्यानगर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्य कारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य सरकारदेखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.
 
फडणवीस पुढे म्हणाले, अहिल्यादेवींनी २८ वर्ष राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने केले.
 
गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहिल्यादेवी यांनी माहेश्वर येथे एक मोठे वस्त्रउद्योग केंद्र उभारले. तेथे माहेश्वरी वस्त्र तयार होऊ लागले. त्यांनी एक समृद्ध अर्थव्यवस्था उभी केली. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणार्‍या त्या पहिल्या महिला शासक होत्या. त्यांच्या सैन्यदलात शिस्त होती, कौशल्य होते. त्यांनी युद्धसज्जतेसाठी स्वदेशी तोफांचे उत्पादनही केले. न्यायपद्धतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन प्रगतिशील होता. त्यांनी आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य केले. सर्वसामान्यासारखे न्यायदान करतांना हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले, असेही फडणवीस म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान असल्याचे सांगितले. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण त्यांनी दिली, असेही ते म्हणाले.अहिल्यादेवी निष्पक्ष व न्यायप्रिय राजमाता होत्या. प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. त्यांनी रस्ते, पूल व घाट बांधले. अहिल्यादेवींचे प्रजाहिताचे धोरण आज शासन राबवीत आहे. याच व्यासपीठावरून जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. अहिल्यादेवींच्या आदर्शावर सरकार काम करत आहे. चौंडी विकासासाठी जो काही आवश्यक निधी लागणार होता, तो देण्याचे काम सरकारने केले, असेही ते म्हणाले.
 
प्रा. राम शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी यांची जयंती सरकारच्यावतीने २०१७ पासून साजरी करण्यात येत आहे. अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस्थळासाठी ६८१ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर  करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे, दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी ‘लोकराज्य’ या विशेषांकाचे प्रकाशन  हस्ते करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित इतर  विशेषांक आणि पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी मोनिकाताई राजळे,  शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, विठ्ठलराव लंघे,  काशिनाथ दाते, अमोल खताळ,  माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

Related Articles