आता निवडणुकांच्या तयारीला लागा   

अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना आदेश

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात लागू शकतात. मुंबईत एकाचा प्रभाग आणि उर्वरीत राज्यात चारचा प्रभाग होईल. त्यामुळे  बहुमताचा आदर करुन पुढे जावे लागणार आहे. आता निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मंगळवारी दिले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापनदिन बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पार पडला. यावेळी पवार बोलत होते. लोकसभा निवडणुकीत 
आपल्याला पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्याला साथ दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. आपण सत्तेत सहभागी झालो आहे. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे गटातटाचे राजकारण सहन केले जाणार नाही. माझे सर्वांकडे लक्ष आहे. काही तक्रारी असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, असेही पवार म्हणाले.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुण-तरुणींना अधिक संधी देण्यात येणार आहे. राज्यात पक्षाचा विस्तार होण्यासाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत. ज्याठिकाणी आम्हाला युती करता येईल अशा ठिकाणी युती होईल. ज्या ठिकाणी जुळणार नाही अशा ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढवण्यात येतील. मुंबई महापालिकेमध्ये एकचा प्रभाग आणि राज्यातील इतर महापालिकांमध्ये चारचा प्रभाग अशा पध्दतीने निवडणुका होवू शकतात. त्यामुळे जे प्रभाग पडतील त्याला समोरे जावा. असाच प्रभाग तसाच प्रभाग यामध्ये अडकून पडू नका? असेही  पवार म्हणाले.

खरी लढाई पुढच्या काही महिन्यांत

लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी काम केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. पुढीच्या काही  महिन्यामध्ये निवडणुका होणार असून ही खरी लढाई असणार आहे. त्यामुळे जीवाचे रान करुन मैदानात उतरा. घराघरामध्ये संपर्क वाढवा. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा. आम्ही तुमची साथ देण्यात कुठेच कमी पडणार नाही, तुम्ही सुध्दा कमी पडू नका. युती विचार तुम्ही करु नका याचा निर्णय आम्ही घेवू. मनापासून काम करा यश नक्की मिळणार आहे, असे ही पवार यांनी यावेळी सांगितले.

लाडकी बहीण योजना निवडणूक जिंकण्यासाठीच

लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करण्यात आला. त्यामुळे याचा फटका आम्हाला बसला. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे आम्ही युतीमधील सर्वच पक्षांनी एकत्र विचारमंथन केले. यामधून लाडकी बहिणीसारखी योजना आणली. लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना त्यांची ताकद दाखवून दिली, असे पवार म्हणाले.
 

Related Articles