शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव   

बेल्हे, (प्रतिनिधी) : रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते, पण रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडून शेतीमधून मिळणारे उत्पन्नही घटते. आता शेतकर्‍यांनी नैसर्गिक आणि विषमुक्त शेती करण्यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. शेतकर्‍यांनी राखलेल्या शेणखताला देखील चांगली मागणी वाढली असून एक ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
 
दरवर्षी गुढीपाडवानंतर शेतकरी नव्याने शेती नांगरट करणे, पलटी मारणे, रोटर फिरवणे, तापलेल्या शेतातून गवत, काडी वेचून एका ठिकाणी जमा करणे, अशा शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो. शेतात शेणखत टाकणे, शेळ्या-मेंढ्या बसवणे ही कामे सुरू असतात. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्याने महागडे खत घेण्यास शेतकरी धजावत नाहीत. त्यात रासायनिक खताने जमिनीचा पोत खराब होत असल्यामुळे बहुंताश शेतकरी आता शेणखताला प्राधान्य देतात. एकदा शेतात शेणखत टाकलेनंतर किमान तीन वर्षे शेती चांगली पिकते, जमीन भुसभुशीत होऊन पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होतो.
 
अनेक शेतकरी नैसर्गिक व विषमुक्त शेतीकडे वळल्यामुळे शेणखताला चांगली मागणी वाढली असून शेतकर्‍यांना चांगली कमाई होते. परिणामी उत्पन्नातदेखील वाढ होते, असा अनेक शेतकर्‍यांचा अनुभव आहे. एक ट्रॉली शेणखतासाठी ५ हजार रुपये आणि भरण्यासाठी ७०० रुपये मजुरी, असे किमान ५ हजार ७०० रुपये मोजावे लागतात, तर एक टिप्परसाठी २२ हजार रुपये मोजावे लागतात. स्थानिकांना शेणखत मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर ठिकाणांहून शेणखत विकत आणत आहेत.
 
शेती नांगरट करणे, पलटी मारणे, रोटर फिरवणे, तापलेल्या शेतातून गवत, काडी वेचून एका ठिकाणी जमा करणे, अशा मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो. माझ्याकडे लहान-मोठ्या १४ गायी आहेत. मुक्तसंचार गोठा असल्याने शेणखतात पालापाचोळा नसतो. या जनावरांच्या शेणखतापासून चांगली मिळकत होते. दोन वर्षांपासून शेतकरी शेणखताला मोठी मागणी करतात; परंतु पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. चार्‍याचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर्षी १२ ट्रॉली शेणखत विकले आहे. वर्षभरातून तीन वेळा शेणखत विक्री होते. त्यातूनच चांगली कमाई झाली आहे, असे शेणखत विक्रेते बाळासाहेब बोर्‍हाडे यांनी सांगितले.
 
शेतीसाठी चार ट्रॅक्टर शेणखत विकत घेतले आहे. दरवर्षी शेणखताचे भाव वाढतच आहेत; परंतु रासायनिक खतापेक्षा शेणखत चांगलेच असून, एकदा शेतात टाकल्यामुळे किमान तीन वर्षे जमिनीचा पोत चांगला राहतो व उत्पन्नात वाढ होऊन पिकावर रोगराईचे प्रमाण कमी राहते, असे शेतकरी वसंतराव कदम यांनी सांगितले.

Related Articles