वाचक लिहितात   

कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्वाळा
 
पश्चिम बंगालमधील नगरपालिकांनी स्थानिक संस्था मानव संसाधन प्रणाली अंतर्गत ई पेन्शन योजनेचे पोर्टल सुरु केले. तिथे विविध पदांवर काम करणार्‍या कायमस्वरूपी कर्मचार्‍यांच्या पदांचे एकत्रीकरण केले आणि त्या सर्वांना एकाच पदाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. या सर्व कर्मचार्‍यांना निवृत्तीपश्चात दरमहा पेन्शन मिळणार होती; परंतु त्या पदांची फक्त नावे बदलली, या कारणाखाली सर्व कर्मचार्‍यांच्या गटाची आवश्यक असणारी माहिती पुरविली नाही. परिणामी त्या कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळू शकली नाही. पेन्शनवर त्यांचे उत्तरायुष्य अवलंबून असते. पेन्शन हा कायदेशीर अधिकार असून चॅरिटी नाही. पेन्शनला एक दिवसही उशीर होता कामा नये. पेन्शन मंजूर करण्यास तांत्रिक त्रुटी किंवा प्रशासकीय चुका असतील, तर त्या अस्वीकारणीय आहेत. अशा चुका न्याय, समानता आणि सुशासनाच्या तत्त्वांविरोधात आहेत, असे म्हणत कोलकाता उच्च न्यायालयाने हुगळी चिनसुराह पालिकेला फटकारले. या न्यायालयीन निर्वाळ्यानंतर ज्या व्यवस्थापनाकडून निवृत्तीपश्चात पेन्शन देणे मंजूर केले जाते, त्या व्यवस्थापनाने आणि तेथील कर्मचार्‍यांनी निवृत्तीपश्चात मिळू शकणार्‍या पेन्शनला वेळेवर सुरुवात होत आहे, की नाही याची खात्री 
करून घ्यावी. 
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.
 
अवमूल्यन कोणामुळे?
 
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की, राज्यात राजकारणाचे अवमूल्यन होत आहे, तसेच भ्रष्टाचार्‍यांची गय करणार नाही. राज्यात राजकारणाचे केवळ अवमूल्यनच नव्हे, तर त्याचा खेळखंडोबा सुद्धा झाला आहे, हे जनतादेखील उघड्या डोळ्यांनी बघत आहे. फडणवीस म्हणतात की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दगा दिल्यापासून राज्यातील राजकारण बदलले. २०१४ मध्ये सत्तास्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याविषयी विचारणा केली होती; परंतु हा प्रस्ताव भाजपला न पटल्यामुळे ठाकरेंनी भाजपची साथ सोडली, यात त्यांचे काय चुकले? आघाडीचा कारभार सुरळीत चालू असताना भाजपने अजित पवार (राष्ट्रवादी) व सेना (शिंदे) गट यांच्यात फोडाफोडीचे राजकारण करून अवैध मार्गाने सत्ता स्थापन केली. याला पवित्र राजकारण म्हणायचे, की गलिच्छ राजकारण?
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
 
सतर्कता महत्त्वाची
 
कोरोना पुन्हा एकदा येतो आहे. या आजाराचे रुग्ण वाढत असले तरी सर्वसामान्य जनतेने घाबरुन न जाता खबरदारी घेऊन जगणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता हा संसर्गजन्य आजार पूर्णपणे नष्ट झालाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहाणे कधीही हिताचे ठरणार आहे.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  
 
वारी मार्गाचे पावित्र्य राखावे
 
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे मुक्काम करुन सासवड घाट चढून गेल्यावर पुढे झेंडे मळा ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत तेथे पालखी विश्रांतीसाठी थांबते; मात्र या ठिकाणापासून जवळच मांसाहार विक्रीचे दुकान अलिकडेच सुरु झाले आहे. माऊलींच्या पादुकाच्या दृष्टीने हे वारीचे पावित्र्य भंग करणारे आहे. या प्रकारास समस्त वारकरी मंडळींनी विरोध करून वारीचे पावित्र्यता राखावी.
 
ओंकार धोंडिबा गायकवाड, पुणे.
 
शैक्षणिक प्रवेश सुसह्य करावेत
 
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी धडपडत आहेत, तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक अकरावीत कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा यासाठी काथ्याकूट करीत आहेत. दहावीत असताना अनेक विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल कोणत्या बाजूने आहे याचा अंदाज विद्यार्थी, पालक, शिक्षकांना आला आहे. आपल्याकडे शिक्षणाचा संबंध नोकरी, व्यवसायाशी जोडला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीपेक्षा भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देतील असाच अभ्यासक्रम निवडण्याकडे पालकांचा कल असतो. अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा यासाठी प्रचंड स्पर्धा लागते. प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थी व पालक प्रचंड तणावात असतात. याचा फायदा घेऊन महाविद्यालये त्या अभ्यासक्रमासाठी मोठी शुल्कवाढ करतात. दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या भविष्याचे सुखद स्वप्न पाहत असतात, त्यांच्यासाठी मात्र हे दुःस्वप्न ठरते. हे चित्र बदलण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.
 
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे

Related Articles