ठाकरे बंधूंचे मनोमीलन अडकले ’पहले आप...’ च्या भोवर्‍यात...   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांनी दिलेली साद व उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद... या टप्प्यावरच शिवसेना (ठाकरे) व मनसेची प्रस्तावित युती अडकली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी युतीसाठी शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, आता राज ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असे वक्तव्य केले होते. त्यावर, शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा, असे मनसेने स्पष्ट केल्याने ‘पहले आप’च्या घोळात युतीची शक्यता मावळणार तर नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.
 
शिवसेना (ठाकरे) व मनसे या दोन पक्षांची युती होणार असल्याची चर्चा दोन महिन्यांपासून सुरू आहे. पण, प्रत्यक्षात दोन पक्षांत याबाबत अजूनही संवाद सुरु झालेली नाही. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना, मनसेसोबत युतीसाठी शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आता राज ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असे वक्तव्य केले होते. त्यावर, शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा, आम्ही देखील युतीसाठी सकारात्मक आहोत, अशी प्रतिक्रिया मनसेने गुरुवारी दिली.यासंदर्भात पत्रकारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाने एक भूमिका मांडली आहे आणि आपण कुठल्याही प्रकारची नकारात्मक भूमिका न घेता त्याकडे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबईच्या हितासाठी सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे, असा विचार उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही, असे सांगितले. मनसेने आतापर्यंत अनेकांबरोबर युती केली किंवा नाही. त्यासाठी प्रस्ताव दिले किंवा घेतले, असे आमच्या निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसेमधील युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Related Articles