प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)   

भारताची विमाने पाडली याचे पुरावे विचारल्यावर, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी, आम्ही समाजमाध्यमांवर व्हिडिओ पाहिले असे हास्यास्पद उत्तर एकदा दिले, तर दुसर्‍यावेळी, प्रश्नच ऐकू आला नाही, असे ते म्हणाले! 
 
सरसेनाध्यक्ष, जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीवरून देशातील वातावरण तापले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानकडून किती राफेल पाडण्यात आली? असा सवाल काँग्रेसच्या वतीने सातत्याने केला जात आहे. काही लढाऊ विमाने पडली, असे जनरल चौहान यांच्या विधानावरून स्पष्ट होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, किती विमानांचे नुकसान झाले, यापेक्षा ते का झाले? हे शोधून काढणे महत्त्वाचे होते. त्यात भारत यशस्वी झाला आणि पाकिस्तानच्या सर्व हवाई यंत्रणा भेदून अचूक हल्ले करण्यात आले. पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराला ‘युद्ध’ हा शब्द वापरला गेला नसला तरी सशस्त्र संघर्षाचे स्वरूप युद्धासारखेच होते. युद्धामध्ये एकाच बाजूची हानी होईल, असे कोणतीही सेना, कोणताही देश गृहीत धरत नाही. संघर्षात कोणाचा विजय झाला, हेच महत्त्वाचे असते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लष्कराने पाकिस्तानची सीमा ओलांडली नाही. हवाई दलाने पाकिस्तानचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. जागतिक पातळीवर भारतीय सैन्य दलाच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली; पण अचानक जाहीर झालेल्या संघर्षविरामाभोवती आजही गूढ कायम आहे. विजयाबद्दल जाहीरपणे बोलताना युद्धात भारताची हानी झाली नाही, असे भासविले जात आहे. आक्षेपाला सुरुवात यातून झाली. किती राफेल पाडली गेली ते सांगा, ही आग्रही भूमिका काँग्रेसने घेतली आहे. जनरल चौहान यांच्या मुलाखतीनंतर तो सूर वाढला आहे. जनरल चौहान यांच्या मुलाखतीमुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली, या निष्कर्षावर मात्र येता येणार नाही. कारण किती विमाने पाडली गेली याची संख्या महत्त्वाची नाही, असे सांगतानाच, ‘भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आहे’ असेही ते म्हणाले आहेत. 

हितसंबंधासाठी वापर

‘ऑपरेशन सिंदूर’चा सर्व तपशील उघड करणे शक्य नाही, हे मान्य; पण या कारवाईतील यशाची माहिती देताना काही उणिवा राहून गेल्या, ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. योग्य संदेश देणे, हा माहिती जाहीर करण्याचा हेतु असतो. तो साध्य झाला का? काही लढाऊ विमाने पाडली गेली तर तेव्हाच ती माहिती देणे नकारात्मक कथन तयार होण्यापासून वाचविणारे ठरले नसते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. भाजपने ‘ऑपरेशन सिंदूर’चा फायदा बिहारमधील आगामी निवडणुकीत व्हावा, यासाठी जोरदार प्रचार सुरु केल्याचे दिसते. एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात जाऊन ‘ऑपरेशन सिंदूर’मागील भारताची भूमिका समजावून देत आहे, दुसर्‍या बाजूला सत्तारुढ पक्ष पक्षीय हितसंबंधासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’चा वापर करत आहे. विरोधी पक्ष परिपक्व म्हणावेत, अशीही स्थिती नाही. किती हानी झाली याची माहिती देशाला होण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. ‘पाकिस्तानला धडा मिळाला, भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते साध्य केले’, ही वस्तुस्थिती आणि तमाम भारतीयांची भावना. अशावेळी सैन्य दलाचे अभिनंदन करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवशेन व्हावे आणि त्यात सर्व संबंधित विषयांवर ऊहापोह व्हावा, अशी भूमिका काँग्रेसला घेता आली असती; पण किती विमाने पडली याच्या उत्तरासाठी अधिवेशनाची मागणी, हे नकारात्मक संदेश देणारेच म्हणता येईल. भारत आणि रशियाने संयुक्तपणे बनविलेली हवाई संरक्षक प्रणाली जगातील संरक्षणतज्ज्ञांमध्ये कुतूहलाचा विषय आहे. चीन आणि अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली असंख्य लढाऊ विमाने भारताने जमीनदोस्त केली. ही विमाने बनविणार्‍या कंपन्यांच्या बाजारभावात घसरण झाली. राफेलसह शस्त्रनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचे व्यवहार, त्यांचा फायदा तोटा यात जागतिक पातळीवर अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. आपल्या संरक्षण क्षेत्रातील कुठल्याही विषयाचा, मुद्द्याचा वापर बाह्यशक्तींना होता कामा नये. सशस्त्र संघर्षात काही नुकसान झाले, हे स्वीकारण्याने कमीपणा येतो, ही भूमिका असता कामा नये. त्याचवेळी काही लढाऊ विमाने पडली म्हणजे संरक्षण सज्जतेत भारत कमी पडला, असा अपप्रचार करण्याची संधी कोणाला मिळता कामा नये. 
 

Related Articles