भारती विद्यापीठ, आंबेगाव, धनकवडी भागात अतिक्रमणे वाढली..   

प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : शहरातील रस्त्यांवर बेकायदा पध्दतीने अतिक्रमणे करणार्‍या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाने केलेली घोषणा हवेतच विरली आहे. शहरातील भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार आणि धनकवडी भागातील रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये अनधिकृत हातगाडी, हॉटेल्स, फेरीवाले, स्टॉलधारक यांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बेकायदा अतिक्रमणावर प्रशासन कधी कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
धनकवडी भागातील बहुतांश रस्त्यांवर पथारी व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. धनकवडी बस स्थानक ते बालाजीनगर बस स्थानक दरम्यान पथारी व्यावसायिकांनी रस्त्यावरच बेकायदा दुकाने थाटली आहेत. पदपथ व फ्रंट तसेच साइड मार्जिनमध्ये ही अतिक्रमणे करण्यात आली आहे. मागील काही वर्षापासून स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते लहान करून पदपथ मोठे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍यांना जास्तीची जागा वापरण्यास मिळत आहे. याचाच फायदा पथारी व्यावसायिक करीत आहेत. नागरिकांना मात्र, हक्काचे पदपथ सोडून मुख्य रस्त्यावरूनच जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अशावेळी लहान मोठे अपघात होऊन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. 
 
या भागातील अतिक्रमणाचे चित्र बदलण्याचे नाव घेत नाही. रस्त्यांवर व पदपथांवर तर अतिक्रमणे आहेतच. त्यासोबत पीएमपीएमएलच्या बस थांब्यांवरही अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी रस्त्यावर विक्रेत्यांचे टेम्पो थांबत असत. आता मात्र, हाथ गाड्यांच्या तुलनेत टेम्पोची मोठी संख्या पहायला मिळते. सातारा रस्त्यावरील राजश्री शाहू चौक ते कलानगर, धनकवडी शेवटचा बसथांबा परिसरात देखील अतिक्रमणात मोठी वाढ झालेली आहे. दोन्ही रस्त्यांच्या बाजूला अनेक हॉटेल, टपर्‍या, स्टॉल आणि दुकाने आहेत. यासह शेडधारकांनी उभे केलेल्या अनधिकृत फ्रंट मार्जिनमुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी थातूरमाथूर कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा ’जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा व्यावसायिकांवर कायमस्वरूपी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.  
 
भारती विद्यापीठ भागातील प्रमुख रस्त्यांवर व चौकात अतिक्रमणात मोठी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या मागील भागात पदपथावरच पथारी व्यावसायिकांनी बेकायदा दुकाने थाटली आहेत. यामध्ये पावभाजी, चायनीज, पान शॉप, फळविक्रेते, पाणीपुरी, वडेवाले आदींचा समावेश आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे कॅम्पस आहे. येथे येणार्‍या विद्यार्थ्यांसह नागरिकांची संख्याही अधिक आहे. त्यांची वाहने मुख्य रस्त्यांवरच लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्यावरून पादचारी नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. त्रिमुर्ती चौकातील मुख्य रस्त्यावरच मोठी अतिक्रमणे झाली आहेत. या ठिकाणी फळविक्रेते, भाजी विक्रेते, बिर्याणी हॉऊस व रसवंतीगृहे दिसून येतात. त्रिमुर्ती चौक ते चंद्रभागा चौकादरम्यान पदपथावरच फुलविक्रेते, भाजी आणि इतर किरकोळ पथारी व्यावसायिकही व्यवसाय करीत आहेत. जिजामाता पुलापर्यंत बहुतांश स्टॉलधारक दिसून येतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी रस्त्याचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे एकाच मार्गावरून वाहनचालकांना मार्ग काढावे लागत आहे. तसेच, रस्त्यांवरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. 
 
चंद्रभागा चौक ते कात्रज डेअरी दरम्यान रस्त्यावर बहुतांश स्टॉलधारक, फेरीवाले, चायनीज व पावभाजी व कच्छी दाबेली व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहे. निलगिरी ते जिजामाता चौकात हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी सुध्दा मुख्य रस्त्यावरच बेकायदा पथारी व्यावसायिकांची दुकाने दिसून येतात. निलगिरी चौकाजवळ मुलीचे वसतीगृह आहे. येथे चहा व नाश्तासाठी विद्यार्थी मोठी गर्दी करीत असतात. आंबेगाव पठार भागातही अनेक रस्त्यावर मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. चिंतामणी ज्ञानपीठ (स्कुल) रस्त्यावर ठिकठिकाणी भाजी, फळे, रसवंती, फेरीवाले, स्टॉलधारकांनी दुकाने थाटली आहेत. मुळात या रस्त्याची रूंदी कमी आहे. हॉटेल्स व दुकानांसमोर अनेक ग्राहक रस्त्यापर्यंत वाहने लावतात. परिणामी परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत बांधकाम विभागाला अनेक तक्रार करण्यात आल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासनाने बेकायदा पथारी व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 
 
बदल्या नंतरही अतिक्रमणात वाढ 
 
शहरातील अतिक्रमणांवर परिणामकारक कारवाई होण्यासाठी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह वरीष्ठ अधिकारी, अतिक्रमण निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणाचे चित्र बदलले नाहीत. महत्वाचे म्हणजे, महापालिकेच्या प्रशासक राजवटीत अतिक्रमणे वाढण्याचे नेमके कारण काय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles