आठवडाभरापासून मान्सून स्थिर   

पुणे : वेळेआधीच राज्यात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास लांबला आहे. मागील सुमारे आठवडाभरापासून मान्सून स्थिर आहे. त्यामुळे मोठ्या पावसासाठी मान्सूनच्या पुढील वाटचालीची प्रतिक्षा नागरिकांना करावी लागणार आहे. पुढील चार दिवस मान्सूनची स्थिती ‘जैसे थे’ असणार असल्याचे संकेत आहेत. 
 
राज्यातील मान्सूनची रेषा मुंबई, अहिल्यानगर, यवतमाळ, बीड, जालना, परभणी, हिंगोली अशी आहे. मागील आठवडाभरापासून मान्सूनने प्रगती केली नाही. त्यामुळे राज्यातील काही भागातील पाऊसही कमी झाला आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यातील धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर कोसळणार्‍या पावसातही घट झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुढील चार दिवस पाऊस वाढणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
 
दरम्यान, आज कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील कमाल आणि किमान तपमानात बदल होणार नसल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील चार दिवसांनंतर तपमानात वाढ होऊ शकते. रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असल्याचेही हवामान विभागाने सांगितले.  
 
पुण्यात पावसाची विश्रांती कायम 
 
पुणे आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ढगाळ वातावरण काही प्रमाणात निवळले असल्याने कमाल आणि किमान तपमानात काही अंशी वाढ झाली आहे. शहर आणि परिसरात पुढील चार दिवस दिवसभर आकाश नीरभ्र असणार आहे. सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. चार दिवसांनंतर मात्र शहरात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुण्यात काल ३४ अंश कमाल, तर २३.५ अंश किमान तपमानाची नोंद झाली.

Related Articles