राजकीय नेते हेच सामाजिक सुधारणांचे उत्तेजक   

डॉ. विजय केळकर यांचे प्रतिपादन 

पुणे : अधिकारी विकास कामाचा आराखडा तयार करतात. धोरणही आखतात. मात्र धोरणाची प्रभावी अमंलबजावणी मंत्री करतात. त्यामुळे राजकीय नेतेच सामाजिक सुधारणा करणारे उत्तेजक असतात. अधिकारी मात्र निमित्त ठरतात. असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी सोमवारी व्यक्त केले. 
 
डॉ. विजय केळकर यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व प्रा. एम.एम. शर्मा यांच्या हस्ते काल पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, पुण्यभूषण फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, उद्योजक गजेंद्र पवार उपस्थित होते. तसेच यावेळी कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार वीर जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
 
डॉ. केळकर म्हणाले, माझे प्राथमिक आणि उच्च शिक्षण पुण्यात झाले. माझ्यावर विद्यार्थी दशेतच संस्कार झाले. आमची पिढी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर घडलेली पिढी आहे. राष्ट्र उभारण्यासाठी पंडित नेहरू, महात्मा गांधी यांनी आमच्यामध्ये स्फुल्लींग चेतवले. आम्ही राष्ट्र उभारणीचे पाईक बनलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 
 
प्रा. एम. एम. शर्मा म्हणाले, अंदाजपत्रक सादर करण्याच्या आधी वैज्ञानिक आणि अर्थ तज्ज्ञांशी चर्चा केली जायची, ती प्रक्रीया केळकरानंतर खंडीत झाली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात दीर्घकालीन अमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टीकोनातून वैज्ञानिक आणि तज्ज्ञ काही सुधारणा सुचवत असतात. त्यांच्या अंमलबवणीची पोहोचपावती मात्र ते वैज्ञानिक आणि तज्ज्ञांपर्यंत पोहोचत नाही. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश धर्मावत यांनी आभार मानले.

केळकरांनी आर्थिक उदात्तीकरणाचा पाया रचला

पुंजीवादी, समाजवादी आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेविषयी वैचारिक संघर्षाचा काळ असताना डॉ. विजय केळकरांनी जीएसटीच्या पुनर्रचनेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला एक दिशा दिली. देशातील आर्थिक उदात्तीकरणाचा पाया डॉ.  केळकर यांनी रचला. त्यांनी आर्थिक धोरणात केलेल्या भक्कम तरतुदींमुळेच आपण समृध्द अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना जीएसटीच्या बाबतीत सगळ्यांचे एकमत करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यात अनेक अडचणी होत्या. देशाच्या विकासासाठी ते एकमत घडवून आणणे आवश्यक होते. जीएसटीच्या माध्यमातून प्रणव मुखर्जी ज्या सुधारणा आणू पहात होते, त्यामागील कल्पकता डॉ. केळकर यांची होती. यामुळे काळा पैसा बंद झाला आणि कर चुकवेगिरी कमी झाली. रेकॉर्डब्रेक जीएसटी गोळा झाला. असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
 

Related Articles