वैष्णवांचा मेळा पुण्यात   

पालख्यांच्या आगमनाने चैतन्य।माऊली-तुकोबारायांच्या नामाचा गजर

पुणे : कपाळी चंदनाचा टिळा, गळा तुळशी माळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, आकाशात उंचावणार्‍या भगव्या पताका, टाळ-मृंदगांचा गजर आणि मुखी हरिनाम अशा वातावरणात लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे वैष्णवांच्या मेळ्यासह शुक्रवारी पुण्यनगरीत आगमन झाले. वैष्णवांचा महासागर आणि ज्ञानबा-तुकारामाच्या गजराने अवघे शहर दुमदुमले. पालख्यांमधील पादुकांचे दर्शन होताच पुणेकर कृतार्थ झाले. 
 
पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच पुणेकर आतूर होते. त्यामुळे त्यांना पालख्यांच्या दर्शनाची आस लागली होती. पालख्यांचे रुप डोळ्यांत साठविण्यासाठी मार्गावर पुणेकरांनी दुपारपासूनच दुतर्फा गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे, यंदाही वारकर्‍यांची आदर्शवत स्वयंशिस्त अनुभवायला मिळाली. पालख्यांचे आगमन होताच पुणेकरांनी पुष्पवृष्टी करीत भक्तिभावाने पालख्यांचे स्वागत केले. पुणेकरांची भक्ती पाहून वारकर्‍यांचा उत्साह वाढत होता. काल सकाळी तुकोबांची पालखी पिंपरीहून, तर माऊलींची पालखी आळंदीतील गांधी वाड्यातून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरासह अभंगांच्या तालावर आनंदाने नाचू-डोलू लागले. त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. 
 
पाटील इस्टेट चौकात ४.५५ वाजता रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ पुणेकरांच्या दृष्टिपथास पडला. तुकोबांची पालखी आणि रथातील पादुका दिसताच भाविक कृतकृत्य झाले. तुकोबांच्या आगमनानंतर माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भक्तांना ३ तास वाट पाहावी लागली. रात्री ७.५५ वाजता आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली प्रकटले अन् भाविकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माऊलींच्या पादुकांवर माथा टेकविण्यासाठी एकच झुंबड उडाली.मात्र, पादुकांचे दर्शन काहींनाच प्राप्त झाले. पण, धन्यत्वाचा अनुभव सर्वांनीच घेतला. पाटील इस्टेट चौकात तुकोबा व ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर फुलांची उधळण करण्यात आली. पालख्या संचेती चौकात आल्यानंतर हेलिकॉप्टरमधून गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. त्यावेळी वारकर्‍यांनी माऊली नामाचा एकच जयघोष केला. 
 
वारकर्‍यांचा हा भक्तिप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्ता मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौक येथे विसावला. तेथे ज्ञानोबा-तुकारामचा एकच गजर झाला. पालख्यांच्या दर्शनासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर ठिकठिकाणी वारकर्‍यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे वारकर्‍यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. टिळक चौकात पालख्यांचे स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. संपूर्ण पालखी मार्गावर पुणेकर वारकर्‍यांच्या सेवेत दंग झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे; तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे रात्री उशिरा विसावली.
 
पुण्यात आज पालख्यांचे आगमन
 
वरूणराजाची विश्रांती 
 
शहरात काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. काल सकाळपासून दुपारपर्यंत पाऊस कायम होता. त्यामुळे पावसातच दोन्ही पालख्यांचे आगमन होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, पालख्यांचे आगमन होण्याच्या आधीच पावसाने विश्रांती घेतली. मागील दोन वर्षे पालख्यांच्या आगमनापर्यंत पावसाला सुरूवातच झाली नव्हती. यावेळी पाऊस सुरूच आहे. मात्र, पालख्यांच्या आगमनावेळी पाऊस थांबला होता. त्यामुळे पालखी मार्गावर पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. 
 
वारकर्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ
 
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात यंदा वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन्ही पालख्यांमध्ये प्रथमच वारी करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून वारकरी सोहळ्यात सहभागी झाली आहेत. पहिलीच वारी असली, तरी वारीत सहभागी झाल्याचे समाधान असल्याची भावना प्रथम वारी करणार्‍या वारकर्‍यांनी व्यक्त केली. 

Related Articles