भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व   

ऐसपैस शिक्षण , संदीप वाकचौरे 

दैनिक केसरीच्या याच सदरात मागील आठवड्यात प्रकाशित झालेल्या इयत्ता दहावीत मराठी भाषेत नापास झालेले विद्यार्थी आणि त्यासंदर्भातील आकडेवारी व करण्यात आलेल्या विश्लेषणासंदर्भाने अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. भाषा शिक्षण आणि शिक्षणाची भाषा यासंदर्भाने अद्यापही गांभीर्याने आपण पाहिले जात नाही, हे वास्तव समोर आले. खरेतर भाषा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. भाषेचे आकलन जितके असेल, तितकीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता असते. त्यामुळे भाषेच्या संदर्भाने आपण अधिक जागृत राहण्याची गरज आहे. भाषा हेच शिक्षणाचे माध्यम आहे. त्यामुळे भाषेच्या संदर्भाने अधिक जागरुकता महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने भाषिक विकासासाठीचा पाया घालण्याची गरज आहे. आज भाषेचा विचार गंभीरपणे होताना दिसत नाही. पालकांनाही भाषा शिक्षणापेक्षा आणि भाषिक विकासासाठीचे प्रयत्न करण्यापेक्षा शिक्षणासाठी भाषेचे माध्यम महत्त्वाचे वाटू लागले आहेत. मुळात आपण भाषा विकासासाठी नेमके काय करतो? याचा विचार करण्याची गरज आहे.
 
शिक्षणात भाषेच्या संदर्भाने सध्या विविध प्रकारचे वाद-प्रतिवाद होऊ लागले आहेत. पहिलीपासून हिंदी विषयाच्या अंमलबजावणीचा विचार शासनाने सुरू केल्यानंतर राज्यात त्याला विरोध झाला. शासनाने तो निर्णय सध्या स्थगित केला. त्याचवेळी राज्यात गेले काही वर्ष सातत्याने इंग्रजी माध्यमात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची टक्केवारी सातत्याने वाढते आहे. ही वाढणारी टक्केवारी चिंताजनक असल्याचे अभ्यासकाचे मत आहे. मुळात बालकाचे शिक्षण हे मातृभाषेत व्हायला हवे असे अभ्यासक मानतात. शिक्षण हक्क कायदा, नुकत्याच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये देखील बालकांच्या मातृभाषेत शिक्षणाचा आग्रह धरला आहे. धोरणात तर त्यापलिकडे जात बोली भाषेचा आग्रह धरला आहे. मुळात मुलांची बोलीभाषा शिक्षणाचे माध्यम झाले, तर चित्र पालटलेले दिसून येईल; मात्र सध्या शिक्षणापेक्षा माध्यमांची प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची वाटू लागली आहे. आज मातृभाषेतील शिक्षण हा विचार केवळ बोलला जातो आहे. त्यादृष्टीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. भाषा शिक्षणाचे शिक्षणातील मोल लक्षात घेऊन त्या दिशेने भाषेचा विचार फारसा होताना दिसत नाही, हे वास्तव देखील समजून घेण्याची गरज आहे.
 
भाषेचा विचार जेव्हा केला जातो, तेव्हा ती केवळ भाषा नाही, तर त्यापलिकडे भाषेचा विचार महत्त्वाचा ठरतो हे लक्षात घ्यायला हवे. भाषेचा विचार होत असताना सांस्कृतिक स्वीकृती आणि सहभाग देखील महत्त्वाचा असतो. मुळात जगातील कोणतीही भाषा शिकण्याला विरोध असता कामा नये. बालकाला हवी ती भाषा शिकण्याचे स्वातंत्र्य असते. मातृभाषेसह बहुभाषा शिकण्यातून भारतीय संस्कृतीची समृद्धता लक्षात येणे आवश्यक आहे; मात्र याचा अर्थ प्रथम स्वतःची भाषा शिकण्याची अधिक गरज आहे. आपली भाषा आपण अधिक समृद्धतेने शिकलो, तरच आपल्याला शिक्षण सुलभ करता येईल. विनोबा म्हणत असे की, आपली स्वतःची भाषा समृद्ध असेल, तर इतर भाषा शिकणे देखील सुलभ होत असते. भाषेच्या माध्यमातूनच देशातील बहुभाषिकता, विविध प्रकारच्या समृद्ध संस्कृतीची जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आपला देश समृद्ध परंपरेतील आहे. आपल्या देशात सांस्कृतिक भिन्नता जितकी आहे, तितकीच भाषिक भिन्नता देखील आहे. देशातील अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्या सर्व भाषांचा विचार केला, तर त्यातून होणारी देवाणघेवाण आणि त्यातून भाषा विकसित होण्यास मदत करणारी ठरत असते. भाषा शिकत असताना भाषेशी नाते सांगणारी संस्कृती देखील शिकणार्‍या सोबत येत असते. त्यामुळे भाषेचा विचार होत असताना आपण त्या अनुषंगाने विचार करण्याची गरज आहे. भाषा शिक्षणाचा विचार केवळ भाषा शिकण्यापुरता असा नाही, तर त्यातील सांस्कृतिक विचारातील देवाणघेवाणीच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा ठरत असतो.
 
भाषा शिक्षणाचा विचार मूल्यांच्या अनुषंगाने देखील केला जात असतो. मूल्यांचा विचार अलिकडच्या काळात अधिक अधोरेखित होऊ लागला आहे. भाषा हे जसे शिक्षणाचे माध्यम आहे, त्याप्रमाणे आपल्या समाजाची असणारी मूल्येदेखील विकसित व रूजवण्याच्या दृष्टीने देखील अधिक महत्त्वाचे आहे. भाषा आपल्या सोबत त्या भाषेचा सांस्कृतिक विचार प्रवाहित करत असतो. सांस्कृतिक विचारधारा पुढे घेऊन जात असताना मूल्यांची विचारधारा अधिक महत्त्वाची ठरते. भाषा केवळ अक्षरांची वर्णमाला घेऊन शिकणे होत नाही, तर त्यासोबत मूल्यांच्या विचाराची देवाणघेवाण आणि रूजवणूक करण्याची गरज आहे. मुलांच्या मनात संवेदनशीलता  रूजवण्यासाठी भाषा हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा आणि त्यातील आशयाचे जसे आकलन उंचावत जाते, शब्दांचा अर्थ उलगडत जातो त्याप्रमाणे संवेदनादेखील उंचावत जातात. भाषेच्या माध्यमातूनच माणसांच्या हृदयापर्यंत पोहचता येते. भाषेतील शब्द जसे ओवीचे रूप धारण करतात, त्याप्रमाणे ते शिव्याचे रूपही धारण करत असते. शब्दांची अदलाबदल केली, तर शब्दांना अर्थ आणि त्यानुसार वर्तनात बदल घडतो. भावनिक बदलाच्या दिशेने प्रवास घडला जातो. भाषा शिक्षणातून संवेदनशीलता, सहानुभूती, समानुभूती आणि कृतिशील संवेदना विकसित करण्याची प्रक्रिया घडण्यास मदत होत असते. त्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
 
सर्वंकष विकास
 
भाषेच्या माध्यमातून जसा मूल्यांचा विचार अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याप्रमाणे व्यक्तिच्या सर्वंकष विकासाची वाट निर्माण होत असते. भाषा शिक्षणातून विद्यार्थ्यांचा तर्कशुद्ध व चिकित्सक विचार, नेतृत्व विकास, मूल्यविकास इत्यादींसह शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक पैलूंचा विकास करण्याची अपेक्षा आहे. मुळात माणूस जो काही विचार करतो तोच मुळी भाषेच्या माध्यमातून. आपल्याला अवगत असलेल्या भाषेतून केलेले वाचन, ऐकलेले विचार समजून घेताना आपण आपल्या मातृभाषेतूनच अधिक विचार करत असतो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा विचार करत असताना तर्कशुद्ध विचार करता येणे, चिकित्सक विचार करता येणे गरजेचे आहे; मात्र आज या दोन्ही विचाराच्या दिशेचा प्रवास होताना दिसत नाही. चिकित्सक विचारासाठीचे पाऊल पडावे असे बोलले जात असले तरी, त्या दिशेने मात्र आपण आपला प्रवास होताना दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या कल्याणासाठी, व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्या साध्य होताना दिसत नाही. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्याकरिता भाषेने पावले टाकण्याची अपेक्षा आहे. 
 
आज समाजात ज्या स्वरूपाची अंधश्रद्धा पसरली जाते आहे. विद्यार्थी निराशेच्या छायेत सापडत आहेत. अशावेळी भाषेच्या माध्यमातून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भाषेच्या माध्यमातून नेतृत्त्व विकासाची अपेक्षा आहे. नेता समाजाच्या भाषेत बोलू लागला की, लोकांना तो नेता आपला वाटू लागतो. भाषेच्या माध्यमातून समाज मनातील भावभावनाचे दर्शन घडत जाते. समाजाच्या भाषेत ज्याला बोलता येते, तो नेता होतो. त्यामुळे नेतृत्त्वाच्या विकासाची वाटही भाषेच्या माध्यमातून जात असते. भाषेच्या माध्यमातून भावनिक विकासाची प्रक्रिया घडते. भाषेच्या माध्यमातून एका अर्थाने भावनिक विकासाला हातभार लावण्याचे काम घडत असते. त्याचप्रमाणे बौद्धिक विकासाच्या प्रक्रियेतदेखील भाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे. मुळात आपण वाचन, भाषण कौशल्याच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती करत असतो. या गोष्टी भाषेच्या कौशल्याशी संबंधित आहेत. भाषा समृद्धतेने प्रवास घडला तरच आपल्याला जगातील ज्ञानाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भाषा हा ज्ञानसाधनेचा मार्ग आहे. शेवटी ज्ञानासाठी चिंतन, मननाची गरज असली तरी त्यासाठी भाषेची प्राप्तीदेखील महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
 
भाषा ही एक अनुशासित व नियमाने चालणारी प्रणाली आहे. ती संस्कृतीचा एकात्मिक भाग असून ती सातत्याने चालणारी एक आंतरक्रिया आहे. भाषा प्रणाली ही संदर्भानुसार समजते व ती संस्कृतीशी संबंधित असते, तसेच भाषा ही सातत्याने विकसित होत जाणारी प्रक्रिया असून, भाषेचा विकास हा कालसुसंगत आणि इतर भाषांकडून शिकत शिकत होत असतो.शाळेतील भाषा शिक्षणासमोरील आव्हानांचा विचार करत असताना, भाषा शिक्षण प्रभावी होण्यासाठी आणि मुलांचा भाषिक विकास होण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मूलभूत कौशल्यांतील निम्न पातळीमुळे मूलभूत मजकूर वाचणे, समजून घेणे आणि लिहिणे यात अडथळे निर्माण होतात. वयोगटानुसार आणि मुलांना शिकण्यासाठी उपयोगी, मनोरंजक अशा गुणवत्तापूर्ण साहित्य सामग्रीची कमतरता असते. आपल्याकडे बालसाहित्यावर फारसे काम होताना दिसत नाही.
 
बर्‍याच वेळा भाषा शिकवणारे अनेक शिक्षक प्रशिक्षित नसतात, असा आक्षेप असला तरी आपल्याकडे पदवीधर आहेत; मात्र भाषा विषयाचे पदवीधारक असले, तरी पदवी ही भाषा शिकवण्यासाठी पुरेशी गोष्ट ठरत नाही. भाषेचे ज्ञान, अभिरूची, साहित्याचे वाचन याचाही विचार करायला हवा. वापरल्या जाणार्‍या अध्यापन पद्धतीत वयानुरूप मुले भाषा कशी शिकतात यावर भर दिलेला नसतो. भाषा शिक्षकाने भाषेचे शिक्षण आनंददायी, परिणामकारक व्हावे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा असते. तसेच भाषिक नैपुण्यांवर प्रभुत्व, मिळविणे महत्त्वाचे मानले पाहिजे; मात्र भाषा शिक्षणाचा विचार पदवी असो इतरत्र देखील गांभीर्याने पाहिले जात नाही. भाषा शिकवणे आणि शिकण्यासाठी शिकण्याची खरच गरज आहे का ? असा प्रश्न विचारणारी माणसेही आपल्याकडे आहेत. भाषेचे अध्यापन त्या त्या स्तरावर समृद्धपणे होण्याची गरज आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे.
 
आज भाषेच्या पदवीधर विद्यार्थ्यांचे पायदेखील ग्रंथालयाकडे वळत नाहीत. ग्रंथालयाची आता गरज नाही असे म्हणण्यापर्यंत लोक पोहचले आहेत. संदर्भ, अवांतर पुस्तकांचे वाचन ही भाषा शिक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची गोष्ट आहे; मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, त्यातून भाषेचे अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया घडत नाही. सध्यातरी आपल्याकडे पाठ्यपुस्तकावरील मजकुरावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जाते. पाठ्यपुस्तके आणि त्यातील पाठ म्हणजे भाषाशिक्षण असा अर्थ लावला जातो. खरेतर भाषा शिक्षणात पाठ्यपुस्तक हे फक्त एक साधन आहे. त्याचा विचारही गंभीरतेने करण्याची गरज आहे. त्यामुळे भाषिक क्षमतांचे मूल्यमापन होण्याऐवजी पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशाच्या स्मरणशक्तीचे मूल्यमापन करण्याकडे कल वाढलेला दिसतो. आपण मूल्यमापनाचा विचार करताना देखील फारसे गंभीरतेने पाहत नाही. पाठ्यपुस्तकातील आशय आणि त्यावर आधारित मूल्यमापन केले जाते. खरेतर आशयातील सरळपणे न जाणवणारा आणि दडलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. मूल्यमापनाचे प्रश्न विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करत असतात. जर सरळपणे आशयावर प्रश्न असतील, तर विद्यार्थी केवळ त्याच दिशेने प्रवास करतील. त्यामुळे खरोखर भाषा शिक्षणाचा विचार गंभीरपणे करायचा असेल, तर अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन या तिन्ही स्तरावर परिवर्तनाची वाट चालावी लागणार आहे. भारतीय भाषेच्या संदर्भात सद्य स्थितीतील भाषेचा वापर भाषेच्या पाठ्यपुस्तकातील मजकूर निवडताना विद्यार्थ्यांच्या समकालीन भाषेचा वापर करणे आवश्यक ठरते. त्यादृष्टीने साहित्य निर्मिती महत्त्वाची ठरते.

Related Articles