दैव आले धावून...   

विमान प्रवास टळला आणि वाचले प्राण

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण करणार्‍या विमानाचे सात प्रवासी दैव बलवत्तर होते म्हणून त्या विमानापासून दूर राहिले. काहींकडे कागदपत्रे अपूर्ण होती, काहीजण वाहतूक कोंडीत अडकले, कोणी शेवटच्या क्षणी जाणे टाळले. तर कोणाला त्याच्या आईने थांबवले. हे सर्व जण गुरूवारी अहमदाबादहून उड्डाण करणार्‍या बोईंग ड्रीमलायनर विमानात चढणार होते, परंतु वेगवेगळ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास झाला नसल्याने त्यांचे प्राण वाचले.  

आणखी काही दिवस थांब ना बेटा...

अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेक हृदयद्रावक कथा समोर आल्या. यमन व्यास यांची ही अशीच एक अंगावर काटा आणणारी कहाणी आहे. लंडनला जण्यासाठी यमन व्यास त्यांनी आपली बॅग पॅक केली होती. घरातून विमानतळाकडे जाण्यापूर्वी ते आईचा निरोप घेत होते. त्यावेळी भावनिक झालेल्या आईने मुलाला आणखी काही दिवस थांब ना बेटा, म्हणून थांबण्याची विनंती केली. आईच्या भावनांमुळे यमनचे पाय मागे सरकले. तो आईचा शब्द मोडू शकला नाही. त्याने त्या दिवशी लंडनला जाणे टाळले. १२ जूनचे एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट त्याने रद्द केले. तेच विमान उड्डाणाच्या काही सेकंदातच जमिनीवर कोसळले. जेव्हा यमनला या विमान अपघाताबद्दल समजले तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. नकळतपणे आईने त्याला मृत्यूच्या दाढेतून परत खेचले होते. 

अपूर्ण कागदपत्रांमुळे नाकारला बोर्डिंग पास 

जैमिन आणि प्रिया पटेल यांच्यासोबतही असेच काहीसे घडले. अहमदाबादच्या चांदलोडिया येथील रहिवासी जैमिन पटेल (२९) आणि प्रिया पटेल (२५) यांना त्यांच्या मित्राने सुट्टीसाठी लंडनला बोलावले होते. एअर इंडियाच्या बोईंग १७१-८ ड्रीमलायनर विमानाने ते गुरूवारी लंडनला जाणार होते; पण कागदपत्रे अपूर्ण   असल्यामुळे त्यांना विमानाचा बोर्डींग पास मिळाला नाही. ते एअरलाइन्स कर्मचार्‍यांना खूप विनवणी करत होते; पण त्यांना विमानात चढू दिले नाही आणि ते निराश होऊन घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांना अपघाताची माहिती मिळाली.

...आणि जयेश ठक्कर यांनी रद्द केले तिकीट 

वडोदराचे रहिवासी जयेश ठक्कर हे व्यवसायानिमित्त बोईंग १७१-८ ड्रीमलायनर विमानाने गुरूवारी लंडनला जाणार होते; पण त्यांचे कोलकात्यातील काम अपूर्ण राहिल्याने ते अहमदाबाद विमानतळावर वेळेवर पोहोचू शकणार नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचे तिकीट रद्द केले. विमान अपघातानंतर त्यांना समजले की, हा विलंब आपला जीव वाचवणारा होता. 

स्वेच्छेने थांबला, म्हणून वाचला

रावजी पटेल हे देखील गुरूवारी याच विमानाने लंडनला रवाना होणार होते. मात्र, काही कामे अपूर्ण राहिल्याने त्यांनी आपले तिकीट रद्द केले. त्यांचे जावई अर्जुन यांना त्यांनी लंडनला जाण्यास सांगितले. त्यामुळे रावजी पटेल हे या दुर्घटनेतून बचावले.

‘११ ए’ आसनाची मागणी वाढली

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात ११ ए या आसनावर बसलेले प्रवासी रमेश विश्वासकुमार चमत्कारीकरित्या वाचले. यानंतर आता सर्वच विमान कंपन्यांचे तिकीट बुक करताना प्रवाशांकडून ‘११ ए’ या आसनाची मागणी वाढली आहे. ‘११ ए’ हे आसन आपत्कालीन मार्गाजवळ आहे. या आसनाचेे तिकीट दर अधिक असतात. विमानाचा प्रकार आणि विमानातील वर्गाच्या वर्गीकरणानुसार आपत्कालीन मार्गाजवळील आसन क्रमांक बदलत असतात. 
 
खरेतर विमान अपघात झाल्यास आपत्कालीन मार्गाजवळील आसन अतिरिक्त सुरक्षा पुरवतात हा फक्त भ्रम आहे; पण एअर इंडियाच्या अपघातानंतर हे आसन प्रवाशांसाठी मानसिक समाधान देणारे ठरत आहे.
 

Related Articles