शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी   

परिसंवादात सूर

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये शिक्षण संस्था वाढल्या आणि विद्यार्थी संख्याही वाढत गेली. बदलत्या संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांमधील चंगळवाद वाढीस लागला असून  शिक्षणवाद बाजूला राहत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असून शिक्षण संस्था आणि पालकांवर पुण्याची ही शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी आहे, असा सूर ’वेध अस्वस्थ मनाचा’ यामध्ये ’पुणे विद्येचे माहेरघर’ या परिसंवादात शिक्षण  क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेल्या विचारांतून उमटला.
 
वेध अस्वस्थ मनाचा याअंतर्गत ’पुणे विद्येचे माहेरघर’ याविषयावर परिसंवादाचे आयोजन पराग ठाकूर, शिरीष मोहिते, उदय जगताप आणि समस्त पुणेकरांच्या वतीने टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, शिक्षण प्रसारक मंडळी च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व विधिज्ञ एस.के.जैन,  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे, मिलिंद लडगे आदी सहभागी झाले होते. यावेळी अनिरुद्ध येवले देखील उपस्थित होते. कार्यक्रमात दिलीप विश्वकर्मा, अजय आबा पाटील, मिलिंद लडगे, डॉ. धर्मराज साठे यांचा पुण्याच्या शिक्षण संस्कृतीत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
 
डॉ.पराग काळकर म्हणाले,  पुण्यामध्ये देशभरातून विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे वसतिगृहाच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा होते. शिक्षणापेक्षा पाल्याला इतर सुविधा जास्त मिळतात का याकडे पालकांचे लक्ष आहे. मात्र, वाढत्या सुविधा आणि खर्च करण्यास सहजपणे मिळणारे पैसे यामुळे विद्यार्थी स्वातंत्र्यांकडे न जाता स्वैराचाराकडे जाऊ शकतात, हे नियंत्रित होणे गरजेचे आहे.  एस.के.जैन म्हणाले, आजचे विद्यार्थी चंगळवादाकडे जात आहेत ही जरी एक बाजू असली तरी त्यांना शिक्षणासोबत दुसर्‍या गोष्टी देणे गरजेचे आहे. जेणेकरून चंगळवादाला आवर घालता येईल. तसेच हे विद्यार्थी चांगल्या कामांमध्ये गुंतून राहतील. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. 
 
डॉ.आर.एम. चिटणीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या वाढत्या नाईट लाईफला सर्व शिक्षणसंस्थांनी एकत्र येऊन विरोध करायला हवा.प्रा. फुलचंद चाटे म्हणाले, विद्यार्थ्यांना योग्य वेळेत चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. मिलिंद लडगे म्हणाले, अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे मुलांचे लक्ष जास्त जात आहे. त्या करता ठोस पावले उचलून ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. पराग ठाकूर व प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत मोहिते यांनी प्रास्ताविक केले. पियुष शहा यांनी आभार मानले.

Related Articles