सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान   

पुणे : आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या ना त्या वाटेने पुलं मला भेटत होते. आकाशवाणीवरून प्रसारीत झालेल्या माझ्या ’पक्ष्यांचे कवी संमेलन’ या श्रृतीकेला पुलंंची मिळालेली दाद हा माझा पहिला पुरस्कार होता आणि आज आयुष्याच्या आणि कारकिर्दीच्याही संध्याकाळी पुलंच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्यामुळे ’धन्य मी, कृतार्थ मी’ अशीच भावना माझ्या मनात असल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी व्यक्त केली.
 
’ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप कार्यक्रमात सई परांजपे यांना एन. एफ. डी. सी.चे संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सई परांजपे यांच्याशी संवाद साधला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला कृष्णकुमार गोयल, चैतन्य कुलकर्णी, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार उपस्थित होते. 
 
परांजपे म्हणाल्या, दूरदर्शन नव्यानेच सुरू होत असताना निर्मात्यांसाठी आलेल्या जााहिरातीला मी प्रतिसाद दिला आणि पहिल्या सहा निर्मात्यांमध्ये माझे नाव समाविष्ट झाले. पुलंना त्यांचे गुरू रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी नितांत आदर आणि श्रद्धा होती. पुलंनी वयाच्या मध्यवर्ती टप्प्यावर बंगाली भाषा देखील अवगत केली. पुलंचा विनोद हा बावन्नकशी सोने होता. विनोदावरील हुकूमतीव्दारे त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले. पुलंनी चार्ली चॅप्लीन प्रमाणेच विनोदाचा आधार घेत संपूर्ण महाराष्ट्राला हसवले आणि प्रबोधन देखील केले. 
 
प्रकाश मगदूम म्हणाले, पुलं हे महाराष्ट्राचे राजदूत होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर जाऊन पुलंनी त्यांच्या विनोदाव्दारे मराठी माणसाची वेगळी ओळख निर्माण केली होती. आजच्या तरूण पिढीलासुध्दा पुलं भुरळ घालतात आणि तरूण पिढी आनंदाने त्यांच्या साहित्याचे वाचन करते, ही पुलंच्या साहित्याची ताकद आहे. यावेळी कृष्णकुमार गोयल, चैतन्य कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. वीरेंद्र चित्राव यांनी प्रस्ताविक केले. सतीश जकातदार यांनी स्वागत केले. अर्चना दीक्षित यांनी मानपत्राचे वाचन केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles