कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट   

४८ तासांत अतिजोरदार पावसाचा इशारा

पुणे : राज्यात रेंगाळलेला मान्सून पुढील चार दिवसात पुन्हा सक्रीय होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या ४८ तासात कोकणात अतिजोरदार, तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 
 
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा गेल्या १५ दिवसांपासून कायम आहे. येत्या ४८ तासात मध्य भारताच्या लगतचा विदर्भ, छत्तीसगड, ओडिसाचा आणखी काही भागात मान्सूनच्या वाटचालीला परिस्थिती अनुकूल आहे. पुढील ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात पुढील ३८ तासात बर्‍याच ठिकाणी विदर्भात आज (शुक्रवारी) काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. 
 
शुक्रवारपासून पुढील दोन दिवस रत्नागिरी, रायगड मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात अत्यत जोरदार म्हणजे २४ तासात २०४.५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 
 
दरम्यान, पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवस आकाश सामान्यत: ढगाळ असणार आहे. येत्या दोन दिवसांत शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणासह हलका पाऊस कायम असणार आहे. शहरात काल ३१ अंश कमाल, तर २१.५ अंश किमान तपमानाची नोंद झाली. शहर आणि परिसरात येत्या बुधवारपर्यंत ढगाळ वातावरण कायम असणार आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा कायम आहे. शहरात काल पावसाने विश्रांती घेतली. 
 
पुण्यात रात्री जोरदार पाऊस 
 
शहर व परिसरात गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, अचानक रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि ढगफुटी सदृश पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहनचालकांची तारांबळ उडाली. कोथरूड, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, कात्रज यासह औंध, बोपोडी, पाषाण, सूस, महाळूंगे आणि बावधन या भागांमध्ये गडगडाटासह मुसळदार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

Related Articles