सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पु. ल. देशपांडे अध्यासन   

चंद्रकांत पाटील यांची घोषणा; ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच पु. ल. देशपांडे अध्यासन सुरू करण्यात येईल. तसेच पुलंच्या साहित्यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. 
 
पुलंचा २५ वा स्मृतिदिन व सुनीताबाईंच्या जन्मदिनानिमित्त ’ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी कृष्णकुमार गोयल, सुनिताबाई देशपांडे यांचे बंधु मोहन ठाकूर, सुशील जाधव, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी उपस्थित होते. 
 
पाटील म्हणाले, उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून माझ्या अधिकारात पु.ल. देशपांडे यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन सुरू करण्याची घोषणा मी करत आहे. मात्र या अध्यासनात पुलंचे साहित्य, त्यांच्या स्मृती कशा जपता येतील. प्रमाणपत्र अभ्यासक्रम कसा सुरू करता येईल, याबाबत जाणकारांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. तसेच पुलोत्सव काळात पुलंच्या साहित्यावर ५० टक्के सवलत देण्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली. 
मधुमंगेश कर्णिक म्हणाले, पुलं हे खर्‍या अर्थाने ’’ग्लोबल’’ व्यक्तीमत्व होते. ललित कलांच्या माध्यमातून त्यांनी मनुष्याचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्न केले. अशा पुलंच्या स्मृती शाश्वत राहण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यासनाची निर्मिती करावी, अशी इच्छा प्रारंभी त्यांनी व्यक्त केली. तसेच जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतो, त्या ठिकाणी पुलं आणि त्यांचे साहित्य ज्ञात आहे. पुलं हे केवळ विनोदी साहित्यिक नव्हते, तर खेळीया होते. हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावणारे ते प्रगल्भ साहित्यिक होते. त्यांनी डॉ. लोहिया, सेनापती बापट, विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि कर्मयोगी बाबा आमटे अशा गंभीर प्रवृत्तींच्या दिग्गज विचारवंतांवर देखील संवेदनशीलतेने लेखन केले आहे. टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये काही काळ व्यथित केल्यानंतर टागोरांची एक वेगळी ओळख पुलंनी महाराष्ट्राला करून दिली.
 
पुलं हे समाजाविषयी कळवळा आणि वात्सल्य असलेले समाजचिंतक होते. कृष्णकुमार गोयल, सुशील जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. सतीश जकातदार यांनी स्वागत केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन सोहळ्यानंतर प्रभा अत्रे यांच्या ’स्वरमयी’ तर्फे सांगितिक सादरीकरण झाले. तसेच ’जावे पुलंच्या गावा’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी मोहन ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रभा अत्रे यांच्या ’स्वरमयी’ संस्थेस विशेष पु. ल. पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेतर्फे डॉ. भारती एम. डी. आणि प्रसाद भडसावळे यांनी स्वीकारला. मानपत्र, पुणेरी पगडी, उपरणे, पंचवीस हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

करूळ गावात वृक्षाच्या रूपाने पुलंच्या स्मृती 

करूळ गावात नाथ पै यांचे स्मारक उभारताना सुनिताबाईंनी त्या काळी १० हजार रूपयांची देणगी पाठवून दिली. पुलं आणि सुनिताबाई यांच्या देणगीची आठवण म्हणून आम्ही बकुल आणि सुरंगीचे रोप लावले. हे रोप तर्कतीर्थ लक्ष्मीणशास्त्री जोशी यांच्या हस्ते लावले. ती झाडे मोठी झाली आहेत. त्या झाडाखाली मुले रोज डबा खातात. या झाडांच्या रूपाने आम्ही पुलं आणि सुनिताबाईंच्या स्मृती जपल्या असल्याचे मधुमंगेश कर्णिक यांनी सांगितले. 
 

Related Articles