राज्यात प्राथमिक आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करणार : मुख्यमंत्री फडणवीस   

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील आरोग्यसेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  
 
मावळ तालुक्यातील आंबी वारंगवाडी येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबईचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलपती संजय पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ, उपकुलपती डॉ. शिवानी पाटील, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शीतल नाईकवाडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आदी उपस्थित होते.
 
पुष्पलता डी. वाय. पाटील धर्मादाय रुग्णालय ६०० खाटांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असून येथे विविध सेवा उपलब्ध आहेत. आंबी, मावळ, तळेगाव भागातील जनतेला या रुग्णालयातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे.
 

Related Articles