स्वप्नवत् पुनरागमन   

मिडविकेट : कौस्तुभ चाटे 

करुण नायर. हे नाव कानावर पडलं की समोर येतो तो एका तंत्रशुद्ध फलंदाजांचा चेहरा. एक असा खेळाडू की जो सतत स्वतःला सिद्ध करू पाहात आहे. गेली काही वर्षे या नावाने भारतीय क्रिकेटमध्ये एक खळबळ उडवली आहे. त्याच्या एका खेळीने त्याला भारतीय क्रिकेटमध्ये मनाचे स्थान दिले खरे, पण त्यानंतर मात्र तो सितारा शांत झाला. आज परत एकदा त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे त्याच्या अथक परिश्रमांनंतर तब्बल ८ वर्षांनी त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे. मिळाले आहे म्हणण्यापेक्षा त्याने आपल्या प्रयत्नांनी मिळवले आहे हे म्हणणे योग्य ठरेल. 
 
२०१६ मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी त्याची भारताच्या कसोटी संघात निवड झाली होती. मालिकेतील तिसर्‍या आणि चौथ्या कसोटीत, आपल्या कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटींमध्ये फारशी चांगली कामगिरी करू न शकलेल्या नायरने चेन्नईच्या तिसर्‍या कसोटीमध्ये मात्र कमाल केली. इंग्लिश संघाने फलंदाजी करताना भरभक्कम ४७७ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने सुरुवात तर चांगली केली होती. पण आपले प्रमुख फलंदाज, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली पाठोपाठ बाद झाले आणि करुण नायरने मैदानावर पाऊल ठेवले. तो मैदानावर आला तेव्हा त्याचा कर्नाटक संघाचा जोडीदार के एल राहुल खेळत होता. त्याच्या साथीने किल्ला लढवत नायरने भारतीय संघाला आधार द्यायला सुरुवात केली.
 
पाहता पाहता आपला डाव आकार घेऊ लागला होता. राहुल बाद झाल्यानंतरही पुढे मुरली विजय, अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या साथीने नायरने फलंदाजी सुरूच ठेवली. कसोटीच्या चौथ्या दिवशी करुण नायरने ३०० धावांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर भारताने आपला डाव घोषित केला, आणि नंतर त्या कसोटीत विजय देखील मिळवला. या सामन्याने भारतीय संघाला एक त्रिशतकवीर दिला होता. करुण नायर हे नाव घराघरात पोहोचलं. भारताचा केवळ दुसरा त्रिशतकवीर.
 
पण... क्रिकेटमध्ये किती अनिश्चितता आहे याचा प्रत्यय दरवेळी येतो. नायरच्या त्या त्रिशतकानंतर त्याचे संघातील स्थान अबाधित असायला हवे होते. पण तसे झाले नाही. अजून केवळ तीन कसोटी सामने खेळल्यानंतर करुण नायर हे नाव भारतीय संघातून गायब झाले. गेल्याच आठवड्यात इंग्लंडला जाणार्‍या संघात त्याची निवड झाल्यानंतर परत एकदा हा सर्व इतिहास उजळला गेला. 
 
करुण नायर, जोधपूर मध्ये एका मल्याळी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील, कलाधरन पेशाने इंजिनियर. करुणच्या जन्मानंतर त्यांनी बेंगळुरूला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. करुणच्या खेळातील पायाभरणीसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने क्रिकेट मैदानावर पाऊल ठेवले आणि  एक एक पायरी चढत तो कर्नाटकाच्या १५ वर्षांखालील संघापर्यंत जाऊन पोहोचला. कर्नाटक क्रिकेट संघाला मोठा इतिहास आहे, आणि त्या संघाचे अनेक जुने खेळाडू नवीन, होतकरू खेळाडूंना मदत करण्यासाठी तयार असतात. 
 
करुण संघात आला तेव्हा द्रविड,कुंबळे यासारखे खेळाडू आता मेंटॉरच्या भूमिकेत आले होते. विनयकुमार, रॉबिन उथप्पा, राहुल, मनीष पांडे सारखे खेळाडू संघात होते. त्यांच्या जोडीनेच नायरची फलंदाजी बहरायला सुरुवात झाली. तो कर्नाटक साठी पहिल्यांदा खेळला (२०१३-१४) तेव्हा कर्नाटकाने महाराष्ट्र संघाला हरवून रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ४९४ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ३ शतके होती. पुढील वर्षी, २०१४-१५ मध्ये कर्नाटकाने पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी जिंकली. त्याही वर्षी करुणने चांगली फलंदाजी केली. खास करून अंतिम सामन्यात, तामिळनाडू विरुद्ध खेळताना त्याने ३२८ धावा केल्या होत्या. त्याच्या कामगिरीची दखल घेतली गेली. पुढे दुलीप, इराणी, भारत ‘अ‘’ संघांमधून तो भारतीय संघात दाखल झालाच. एकूणच करुणच्या सुरुवातीच्या जडणघडणीत बेंगळुरू आणि कर्नाटक संघाचा महत्वाचा वाटा आहे. 
 
२०१६ मधील इंग्लंड विरुद्धच्या त्या त्रिशतकानंतर तो फक्त तीन सामने खेळला. त्याची कामगिरी चांगली झाली नाही, आणि त्याला संघाबाहेर जावे लागले. खरे पाहता त्याला अजून संधी देणे आवश्यक होते, पण ते झाले नाही. पण तो प्रयत्न करत राहिला. त्याचा २०१७-१८ चा रणजी सिझन चांगला गेला. त्या मोसमात त्याने ६८ च्या सरासरीने ६०० पेक्षा जास्त धावा केल्या. पण नंतर त्याच्या फलंदाजीला उतरती कळा लागली. त्याला कर्नाटक संघातून आपले स्थान देखील गमवावे लागले. 
 
२०२३-२४ मध्ये त्याने विदर्भाकडून खेळायला सुरुवात केली आणि चमत्कार झाल्यासारखा त्याच्या बॅट मधून धावांची टांकसाळ सुरु झाली. त्या मोसमात त्याने २ शतकांच्या साहाय्याने ६९० धावा केल्या, आणि मागील मोसमात, २०२४-२५ मध्ये तर केवळ ९ सामन्यांत ८६३ धावा करून त्याने निवड समितीचे दरवाजे ठोठावयाला सुरुवात केली. डिसेंबर २०२२ मध्ये, कदाचित त्याच्या कारकिर्दीच्या अंधार्‍या काळात त्याने केलेले एक ट्विट फारच प्रसिद्ध झाले होते. त्या ट्विटमध्ये त्याने क्रिकेट देवाची प्रार्थना केली होती. क्रिकेट देवा, मला अजून एक संधी मिळू दे. यातच सर्व काही आले होते. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. 
 
अखेरीस  भारताच्या इंग्लंडला जाणार्‍या संघात त्याचे पुनरागमन झाले. ८ वर्षांच्या दीर्घकाळानंतर तो परत एकदा संघात आला. त्याचबरोबर गेल्याच आठवड्यात इंग्लंड ’अ’ संघाविरुद्ध खेळताना त्याने आपल्या फलंदाजीची चुणूक परत एकदा दाखवली. या सामन्यात द्विशतक करत आपण इंग्लंड दौर्‍यासाठी सज्ज असल्याचे जणू संकेत दिले. विराटच्या निवृत्तीनंतर आता आपल्या मधल्या फळीत एका दर्जेदार फलंदाजांची उणीव नक्की भासणार आहे. ती जागा भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अर्थात हा दौरा सोपा नाही याची त्यालाही कल्पना असणार आहे. पण त्याने गेल्या ८ वर्षांमध्ये घेतलेली मेहनत, त्याची प्रतीक्षा त्याला चांगले फळ देईल अशी आशा आहे. 
 
भारतीय क्रिकेटच्या ९०-९५ वर्षांच्या इतिहासात केवळ २ फलंदाजांनी एका सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. करुण नायरच्या त्या कामगिरीची क्रिकेट इतिहासाने दखल घेतली असली तरीही त्याला वर्तमानात पुन्हा एकदा अशी कामगिरी करून दाखवावी लागेल. त्याची धावांची भूक, त्याचे प्रयत्न आणि जिगर बघता, येणार इंग्लंडचा दौरा त्याच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे. या दौर्‍यात त्याने चांगला खेळ केला तर करुण नायरची ’कमबॅक स्टोरी’ भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची, सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणारी गोष्ट असेल हे नक्की.
 

Related Articles