E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!
Samruddhi Dhayagude
08 Jun 2025
चर्चेतील चेहरे : राहुल गोखले
विजय येलाकांती दिग्दर्शित ‘१९४६: डायरेक्ट अॅक्शन डे’ या चित्रपटाची दखल नुकत्याच पार पडलेल्या ७८ व्या कान चित्रपट महोत्सवात घेण्यात आली. एव्हाना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत या चित्रपटाने पंधराएक पारितोषिके जिंकली आहेत. तरीही कान महोत्सवातील दखल निराळीच असते.
भारताची फाळणी होत असताना बंगालमधील अतिशय गुंतागुंतीच्या पण आता काहीशा विस्मृतीत गेलेल्या घडामोडींचे चित्रण करणारा हा चित्रपट. या चित्रपटातील नायक-नायिका अभिषेक सिंह व (रईमा सेन ,गाजलेली अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात) यांना कान महोत्सवात ’रेड कार्पेट’चा मान मिळाला एवढ्याच वर्णनावरून विशेषतः अभिषेक सिंह यांच्या कामगिरीचे अनोखेपण लक्षात येणार नाही. त्यासाठी हे सांगायला हवे की अभिषेक हे काही रूढ अर्थाने कलाकार नाहीत. इतकेच नव्हे; चित्रपटसृष्टीशी त्यांचा किंवा त्यांच्या कोणा कुटुंबियाचा दुरान्वये संबंध नाही. अभिषेक हे सनदी अधिकारी होते. नोकरशाहीत दशकभर काम केल्यानंतर अभिषेक यांची पावले मनोरंजन क्षेत्राकडे वळली. आता ते तेथेच रमत आहेत असे वाटत असले तरी हा देखील त्यांचा कायमसाठीचा मुक्काम आहे का हे सांगता येणार नाही. अशी वदंता आहे की त्यांना राजकीय क्षेत्र खुणावते आहे. ‘कान’च्या निमित्ताने अभिषेक सिंह पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.
अभिषेक यांचे वडील आयपीएस अधिकारी होते. तेंव्हा सनदी अधिकारी होण्याच्या दृष्टीने अभिषेक यांना त्यांनीच प्रेरणा दिली असेल असे मानले जाणे स्वाभाविक. पण अभिषेक यांचा काही तसा इरादा नव्हता. ते त्याकडे वळले ते अपघातानेच. २२ ऑगस्ट १९८३ रोजी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्मलेले अभिषेक यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर कदाचित त्यांनी त्याच क्षेत्रात उच्च शिक्षणही घेतले असते. पण वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांचा प्रेमभंग झाला आणि ते नैराश्यात गेले. अशा नैराश्यातून बाहेर येणे सोपे नसते. पण अभिषेक यांनी त्यातून बाहेर येण्यासाठी भव्य ध्येय समोर ठेवले. ते म्हणजे स्पर्धा परीक्षा (यूपीएससी) देण्याचे. मुळात यूपीएससीमध्ये उत्तीर्ण होणे सोपे नाही; त्यातही नैराश्याच्या अवस्थेत त्यासाठीची तयारी करणे हे आणखी जिकिरीचे. पण अभिषेक यांनी जिद्दीने ते ध्येय गाठले. ते नैराश्यातून बाहेर आले आणि युपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले; तेही देशपातळीवर ९४ व्या क्रमांकाने. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु असतानाच त्यांची गाठ दुर्गा यांच्याशी पडली. त्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होत्या. त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्यांच्या गाठी जुळल्या. त्या पंजाब केडरच्या अधिकारी. त्याही देशपातळीवर २० व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाल्या. २०१२ मध्ये अभिषेक आणि दुर्गा विवाहबद्ध झाले. त्यानंतर दुर्गा यांना उत्तर प्रदेश केडर देण्यात आले.
अभिषेक यांना सुरुवातीस दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. तीन वर्षांनी त्यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. दिल्लीत असताना अभिषेक यांनी कोरोनाच्या काळात प्राणवायू पुरविणार्या मोबाईल युनिटची व्यवस्था करण्यात पुढाकार घेतला होता. लशीकरणासाठी त्यांनी दिल्लीत ’युनायटेड ब्लड’ मोहीम राबविली होती. कोरोनाकाळात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आणि रोजगाराचे मोठे संकट निर्माण झाले. तेंव्हा अभिषेक यांनी रोजगार देणारे आणि शोधणारे यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ‘सिग्मा’ मोहीम राबविली.
देखणे व्यक्तिमत्व लाभलेला एक धडाडीचा सनदी अधिकारी असा लौकिक झालेल्या अभिषेक यांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली. समाजमाध्यमांवर त्यांना पसंत करणार्यांची संख्या मोठी आहे. एकट्या इन्स्टाग्राम वर त्यांच्या ’फॉलोअर्स’ची संख्या ५० लाखांच्या जवळपास आहे. कदाचित त्यामुळे असेल; पण सनदी अधिकारी म्हणून असणार्या जबाबदार्या आणि मर्यादा यांकडे अभिषेक यांचे दुर्लक्ष होऊ लागले. परिणामतः अनेक वादांत ते ओढले गेले.
दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर असताना त्यांना मुदतवाढ मिळाली; पण त्यावेळी बराच कालावधी ते वैद्यकीय सुटीवर होते. त्यानंतर ते कामावर रुजू झाले; तथापि दिल्ली सरकारने त्यांना उत्तर प्रदेशात त्यांच्या मूळ केडरमध्ये पाठवून दिले. २०२२ च्या जून महिन्यात अभिषेक उत्तर प्रदेशात रुजू झाले. त्या वर्षी गुजरात विधानसभेच्या होणार्या निवडणुकीत अभिषेक यांची नेमणूक दोन मतदारसंघांत केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून झाली होती. पण त्यांनी सरकारी वाहनासमोर उभे राहून घेतलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसृत केले. ’अभिषेक एस आयएएस’ अशा नावाने समाजमाध्यमांत खाते असणारे अभिषेक यांनी गुजरात निवडणुकीच्या वेळच्या आपल्या छायाचित्रात आपण पर्यवेक्षक असल्याचा उल्लेख केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत अभिषेक यांची नेमणूक रद्द केलीच; पण पुढील आदेशापर्यंत निवडणुकीसंबंधी कोणतीही जबाबदारी देण्यावर निर्बंध घातले. त्याच सुमारास बहुधा त्यांचा कल मनोरंजन सृष्टीकडे वळला असावा. त्यांनी प्रशासनाची पूर्व अनुमती न घेताच कामावर दांडी मारली. सुमारे ऐंशी दिवस ते कामावर रुजू नव्हते. तेंव्हा उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ सरकारने त्यांना २०२३ मध्ये निलंबित केले. त्यांचे निलंबन फेब्रुवारी २०२४ मध्ये मागे घेण्यात आले; तेंव्हा अभिषेक यांनी पदाचा राजीनामा देऊन टाकला.
हे सगळे घडत असताना दुसरीकडे अभिषेक यांना मनोरंजन सृष्टीचे आकर्षण निर्माण झाले होतेच. बी प्राक, बादशहा अशा लोकप्रिय गायक- संगीत दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या संगीत व्हिडियोमध्ये अभिषेक यांनी काम केले. ‘दिल्ली क्राईम’ नावाच्या एका थरारपटात अभिषेक यांनी आयएएस अधिकार्याची भूमिका वठवली होती. जुबिन नौटियालच्या एका गाण्यावर देखील अभिषेक यांनी अभिनय केला होता. पण तरीही त्यांना ओढ होती ती रजत पडद्याची. चित्रपटांतच कारकीर्द करायची असे निश्चित झाल्यानंतर अभिषेक यांनी अनेक चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांची भेट घेतली. राम गोपाल वर्मा यांना भेटण्यास गेले असता तेथे त्यांची भेट सहनिर्मात्याशी झाली आणि त्यांनी अभिषेक यांची भेट निर्माते टी जी विश्व प्रसाद यांच्याशी घालून दिली. ती भेट निर्णायक ठरली. प्रसाद यांनी अभिषेक यांच्या चाचण्या घेतल्या आणि मग त्यांना चित्रपटात भूमिका देण्याचा निर्णय घेतला.त्यातूनच ‘१९४६’ चित्रपटात अभिषेक यांना आघाडीची भूमिका मिळाली. (योगायोग असा की दिग्दर्शक येलाकांती हेही तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रातून चित्रपट क्षेत्रात आले आहेत). या चित्रपटाचे अगोदरचे नाव ‘माँ काली’ असे असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील रसिकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे नामांतर ‘१९४६: डायरेक्ट अॅक्शन डे’ असे करण्यात आले. कान्स महोत्सवात या चित्रपटाची दखल घेण्यात आली. नोकरशहीत कर्तृत्व गाजवून त्यापेक्षा अगदी भिन्न अशा मनोरंजन क्षेत्रात आश्वासक चेहरा म्हणून लक्ष वेधून घेणारे अभिषेक बहुधा पहिलेच असतील. ’कान’ हे ध्येय नाही मात्र आपण योग्य मार्गावर आहोत याचे ते केवळ प्रतीक आहे’ अशी प्रतिक्रिया अभिषेक यांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
असे म्हटले जाते की २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी अभिषेक यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजप करीत होता. ‘आपण उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमधील राजकीय नेत्यांची विशिष्ट प्रतिमा बदलू इच्छितो; या प्रदेशातील यशस्वी राजकीय नेता होण्यासाठी बाहुबली किंवा विशिष्ट जातीचेच असले पाहिजे ही समजूत आपण दूर करू इच्छितो’ असे सूतोवाच अभिषेक यांनी केल्याने शंकांत भरच पडली. त्या शंकांनी उचल खाल्ली ती अभिषेक यांच्या सक्रियतेमुळे.
रामजन्मभूमी मंदिराला भाविकांना भेट देता यावी म्हणून अभिषेक यांच्या पुढाकाराने जौनपूर-अयोध्या मोफत बस सेवा सुरु करण्यात आली. शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी मोहीम राबविली. होळी, ईद सणांचे सार्वजनिक आयोजन केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रातील माजी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून उमेदवारी दिल्याने अभिषेक यांची संधी हुकली. आपण कोणत्या राजकीय पक्षाचा संपर्कात आहोत यांचे स्पष्ट उत्तर अभिषेक यांनी दिले नसले ती त्यांचा कल भाजपकडे आहे हे लपलेले नाही. त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले होते हे पुरेसे बोलके. आता अभिषेक २०२७ च्या विधानसभा निवडणुकांची तयारी करीत असल्याचे बोलले जाते. मात्र वादांनी अभिषेक यांची पाठ सोडलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तेंव्हा आपल्याला पुन्हा प्रशासकी सेवेत रुजू करून घ्यावे असा अर्ज त्यांनी केला होता; पण तो अर्ज स्वीकारण्यात येऊ नये अशी विनंती आदित्यनाथ सरकारने केंद्राला केली होती अशी वदंता होती. अभिषेक यांचे अनेक व्हिडियो असे आहेत ज्यांत ते मनमुराद नाचताना दिसतात; व्यायामशाळेत व्यायाम करताना दिसतात. मात्र मग आयएएस म्हणून त्यांची अपंग कोट्यातून निवड कशी झाली होती असे प्रश्न ऐरणीवर आले; त्यांच्या वडिलांच्या हस्तक्षेपाने त्यांची निवड सुकर झाली का हाही प्रश्न उपस्थित झाला. (पूजा खेडकर प्रकरण ताजेच असल्याने अभिषेक यांच्यासंबंधी संशयामध्ये भरच पडली). आपण आरक्षणाला अनुकूल भूमिका घेत असल्याने आरक्षणविरोधी लोक आपली प्रतिमा मलीन करीत असल्याचा युक्तिवाद अभिषेक यांनी केला. तो कितपत पटणारा होता हा भाग वेगळा.
आयुष्याच्या एका कठीण वळणावर स्वतःस सावरून अभिषेक यांनी सनदी अधिकारी; मग चित्रपटात नायक अशी वळणे घेत स्वतःस सिद्ध केले आहे. अर्थात त्यात ते काहीदा वादग्रस्त देखील ठरले आहेत. मात्र तरीही त्यांची वाटचाल अनेकांना प्रेरक वाटावी अशीच. याचाच पुढचा टप्पा म्हणून अभिषेक सिंह राजकारणात सक्रिय झाले तर आश्चर्य वाटायला नको.
Related
Articles
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
जागतिक नाणेनिधीचा भारतावर विश्वास
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
जागतिक नाणेनिधीचा भारतावर विश्वास
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
जागतिक नाणेनिधीचा भारतावर विश्वास
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
जागतिक नाणेनिधीचा भारतावर विश्वास
16 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !