समृद्धीप्रमाणे शक्तीपीठही वेळेत पूर्ण करु : मुख्यमंत्री   

मुंबई, (प्रतिनिधी) : शक्तिपीठ महामार्गाला मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात मोठा विरोध होत असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याबाबत सरकार पुढे जाणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना फडणवीस यांनी, समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण केला, आता शक्तीपीठ महामार्गही करु, असा निर्धार व्यक्त केला.
 
मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. यानंतर आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.  शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वाढवण बंदराशी जोडणार

समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. समृद्धी महामार्गामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदूषणास आळा बसणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच, नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 
 

Related Articles