समृद्धी महामार्गाच्या कामात १५ हजार कोटींचा गैरव्यवहार   

काँग्रेसचा आरोप;श्वेतपत्रिका काढा

मुंबई, (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. परंतु, हा महामार्ग गैरव्यवहाराचे कुरण ठरला आहे. ५५  हजार कोटींचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटींवर गेला. १५ हजार कोटींनी प्रकल्पाचा खर्च फुगवला गेला. यात मोठा गैरव्यवहार झाला असून नैतिकता शिल्लक असेल तर सरकारमध्ये समृद्धी महामार्ग प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी दिले.
 
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की,  घोडबंदर भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात ३ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचे उघड झाले आहे, सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा पडल्याने नाईलाजाने ह्या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले. घोडबंदर भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. समृद्धी महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकर्‍यांना भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरु आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा. महामार्ग सुरु झाल्यापासून विविध अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर शेकडो जखमी झाले आहेत. 
 

Related Articles