भारतीय युवा फलंदाज चमकले   

लंडन : एका बाजूला आयपीएल स्पर्धे शेवटच्या टप्प्यात असताना दुसर्‍या बाजूला भारतीय ’अ’ संघातून टीम इंडियातील रायझिंग स्टार्संनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटीची तयारी सुरु केली आहे. २० जूनला सुरु होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी अभिमन्यू ईश्वरन याच्या नेतृत्वाखालील भारतीय ’अ’ संघ इंग्लंड लायन्स विरुद्द अनौपचारिक कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला आहे. 
 
पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यातील पहिल्या डावात करूण नायरनं द्विशतकी खेळीसह लक्ष वेधले पण एवढेच काय तर ज्याला इंग्लंड दौर्‍यासाठी मुख्य संघात स्थान मिळालेले नाही त्या सरफराज खाननेही दमदार खेळी केली.पण अभिमन्य ईश्वरनसह, यशस्वी जैस्वाल आणि नितीश कुमार रेड्डी यांना पहिल्या डावात धावा करता आल्या नव्हत्या. त्यांची कामगिरी टीम इंडियाच टेन्शन वाढवणारी होती. पण दुसर्‍या डावातच या मंडळींनी हे टेन्शन दूर केले. 
 
करुण नायरच्या द्विशतकासह ध्रुव जुरेल ९४ (१२०) आणि सरफराज खान ९२ (११९) यांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ५५७ धावा काढल्या होत्या.याला प्रत्युत्तर देताना टॉम हेन्स १७१ (२७९) , मॅक्स होल्डेन १०१ (१०१) आणि मुसले ११३ (१५७) या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंड लायन्सच्या संघाने  आपल्या पहिल्या डावात ५८७ धावा करत ३० धावांची अल्प आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय संघाकडून दुसर्‍या डावात २ विकेट्सच्या मोबदल्यात २४१ धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिला. पण यशस्वी जैस्वाल ६४(६०) आणि अभिमन्य ६८ (८८) यांनी अर्धशतके झळकावली. 
 
 पहिल्या डावात स्वस्तात माघारी फिरलेल्या नितीश कुमार रेड्डीनंही ५२ (४७) नाबाद अर्धशतक झळकावले.दुसर्‍या बाजूला ध्रुव जुरेलनं ५३ (५३) दुसर्‍या डावातही अर्धशतक पूर्ण केले अन् तो नाबादही राहिला. ही चौघेही इंग्लंड दौर्‍यावरील पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा भाग आहेत. सामन्याचा निकाल लागला नसला तरी त्यांची बॅट तळपल्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासाच मिळाला आहे.

Related Articles